पांडवकड्यावर बंदीची ऐशीतैशी
By Admin | Updated: June 25, 2016 02:12 IST2016-06-25T02:12:06+5:302016-06-25T02:12:06+5:30
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेलापूरजवळील पांडवकडा धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचे पाय धबधब्याकडे वळायला सुरुवात झाली आहे

पांडवकड्यावर बंदीची ऐशीतैशी
वैभव गायकर, पनवेल
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेलापूरजवळील पांडवकडा धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचे पाय धबधब्याकडे वळायला सुरुवात झाली आहे. बंदी असूनही शुक्रवारी पर्यटकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.
गेल्या तीन-चार वर्षांत पांडवकडा धबधब्यावर सात ते आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्साहाच्या भरात, पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने या दुर्घटना झाल्याचे तपासात उघड झाले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने धबधब्यावर बंदी घातली आहे.
खारघरसारख्या सिमेंटच्या जंगलात निसर्गरम्य धबधबा ही कल्पनाच मनाला सुखावणारी आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणाला भेट देतात. मद्यपी पर्यटकांमुळे धबधब्याचा परिसर विद्रूप होत आहे. अतिवृष्टीत धबधब्यावरून पडणारे पाणी जोरात उसळते. अशा वेळी पट्टीचे पोहणारेही वाहून जाण्याचा धोका असतो. या दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने धबधब्यावर बंदी घालण्यात आली आहे. शुक्र वारी पर्यटक दुचाकी घेऊन धबधब्याचा प्रवाह ओलांडताना दिसले. अनेक पर्यटक मुंबई, ठाणे, मुंब्रा परिसरातून आले होते. मुंब्य्रावरून दहा जणांचा ग्रुप याठिकाणी सहलीसाठी आला होता. धबधब्यावर जाण्यास बंदी असल्याचे त्यांना माहीत नव्हते. शिवाय त्यांना कोणीही अडवले नसल्याचे अहमद शेख या तरुणाने सांगितले.
पांडवकडा धबधब्याच्या परिसरात केवळ बंदी असलेले फलक याठिकाणी लावले आहेत. वनविभागाचे कर्मचारी अथवा पोलीस बंदोबस्त याठिकाणी नसल्याचे आढळून आले.
धबधब्यावर पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत. पर्यटकांनी पोलिसांशी वाद न घालता सूचनांचे पालन करावे. अतिवृष्टीत धबधब्यावरून मोठमोठे दगड-गोटे पडतात. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. वनविभागाला ठिकठिकाणी सूचना फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- दिलीप काळे,
खारघर वरिष्ठ पोलीस निरीक्षक