नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा, अर्थसंकल्पातून अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 00:19 IST2021-02-01T00:19:02+5:302021-02-01T00:19:27+5:30
Nerul-Uran railway News : बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी पूर्ण होणार याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प भूसंपादन तसेच निधीअभावी रखडला होता.

नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा, अर्थसंकल्पातून अपेक्षा
- वैभव गायकर
पनवेल : बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी पूर्ण होणार याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प भूसंपादन तसेच निधीअभावी रखडला होता. रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद केली जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
सिडकोच्या वतीने १९९७ साली नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. २०१२मध्ये या मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. २७ कि.मी. लांबीचा हा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पाचा ६७ टक्के खर्च सिडको आणि ३३ टक्के खर्च रेल्वे करणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च ५०० कोटी अपेक्षित होतो. आता मात्र हा खर्च दोन हजार कोटींवर गेला आहे. गेल्या वर्षी ४ नोहेंबरला नेरूळ-उरण रेल्वे मार्गावर खारकोपरपर्यंत पहिल्या टप्प्यात रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. मात्र वर्ष उलटून गेले तरी उर्वरित खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम रखडले होते. कधी वनविभागाच्या जमिनीचे भूसंपादन, कधी खारफुटी आणि खासगी जमिनीच्या संपादनामुळे हे काम रखडले होते. आता या अडथळ्यांपैकी खासगी जमीन संपादनाचा अडथळा दूर झाला असला तरी निधीअभावी हा प्रकल्प रखडला असल्याचे बोलले जात आहे. खारकोपर रेल्वेस्थानकामुळे उलवे नोड नवी मुंबईला जोडला गेला आहे. दुसरा टप्पा पूर्णत्वाला आल्यास नवी मुंबई उरण प्रवास सुखकर होणार आहे. रेल्वेच्या अर्थसंकल्पात हा रखडलेला टप्पा मार्गी लावण्याबाबत अपेक्षा आहे.
जमिनीचे निवाडे अंतिम टप्प्यात
खारकोपर ते रांजणपाडा दरम्यान असलेल्या खासगी जमिनीचे संपादन रखडले होते. या प्रकल्पामध्ये सुमारे ६७ गुंठे खासगी जमीन संपादित करावी लागणार आहे. या ६७ गुंठे जमिनीचे निवाडे अंतिम टप्प्यात आले असून प्रारूप मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविण्यात आले असल्याचे बोलण्यात आले असले तरी हा दुसरा टप्पा कधी मार्गी लागणार याबाबत येथील रहिवाशांना प्रश्न पडला आहे.