५,८९२ जलस्रोतांची तपासणी बाकी
By Admin | Updated: April 21, 2016 02:52 IST2016-04-21T02:41:43+5:302016-04-21T02:52:20+5:30
ग्रामीण भागातील सहा हजार तीन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त १११ स्रोतांतील पाण्याचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यास यश आले आहे

५,८९२ जलस्रोतांची तपासणी बाकी
आविष्कार देसाई, अलिबाग
ग्रामीण भागातील सहा हजार तीन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त १११ स्रोतांतील पाण्याचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यास यश आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे अद्यापही पाच हजार ८९२ पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी होणे बाकी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ जिल्हा परिषद थांबविणार की नाही, असा प्रश्न पडला आहे.
रायगड जिल्हा परिषदेमार्फत रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा हजार तीन पाण्याच्या स्रोतांतील रासायनिक घटक तपासणी अभियान १ मार्च ते ३० मे २०१६ या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देणे हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे.
शुध्द पाणी पिल्याने साथीचे आजार पसरल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर उपाययोजना म्हणून वर्षातून दोन वेळा म्हणजे मार्च आणि आॅक्टोबर महिन्यात अशी दोन वेळा पिण्याच्या पाण्यातील रासायनिक नमुन्यांची तपासणी केली जाते. प्रयोगशाळेतील अहवालात ज्या ठिकाणचे पाणी दूषित आढळते त्या ठिकाणच्या पाण्याच्या स्रोतांच्या तातडीने शुध्दीकरणाबाबत उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. जिल्हास्तरावरील अलिबाग, पेण, कर्जत, रोहे, माणगाव, महाड या ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. कर्जत, पेण आणि रोहे या उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये फक्त १११ पाण्याचे नमुने पाठविण्यात आले आहेत.