११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:49 IST2025-11-01T16:48:39+5:302025-11-01T16:49:35+5:30
तिकीटधारकाने तब्बल ११ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जिंकले आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढा मोठा जॅकपॉट लागूनही हा विजेता अजूनपर्यंत आपले बक्षीस घेण्यासाठी पुढे आलेला नाही.

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या तिकीटधारकाने तब्बल ११ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जिंकले आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढा मोठा जॅकपॉट लागूनही हा विजेता अजूनपर्यंत आपले बक्षीस घेण्यासाठी पुढे आलेला नाही. त्यामुळे लॉटरी एजन्सीने या भाग्यवान विजेत्याचा शोध सुरू केला आहे. हे तिकीट 'रत्न लॉटरी' एजन्सीतून विकत घेण्यात आले होते.
एजन्सी मालक उत्साहात, पण विजेता गायब!
बठिंडा येथील रत्न लॉटरी एजन्सीचे संचालक उमेश कुमार यांनी सांगितले की, "मी विजेत्याचा शोध घेत आहे." त्यांच्या एजन्सीमार्फत विकल्या गेलेल्या एका तिकिटावर हे मोठे बक्षीस लागले आहे. "निकाल जाहीर झाल्यावर आणि आमच्या एजन्सीच्या तिकीटाने ११ कोटींनी जिंकल्याचे कळताच, आम्हाला खूप आनंद झाला आहे. हे तिकीट कोणी घेतले, हे जाणून घेण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत."
उमेश कुमार यांनी सांगितले की, सामान्यतः बक्षीस लागताच विजेते लगेच संपर्क साधून पुढील औपचारिकता पूर्ण करतात, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. "विजेत्याने आमच्याशी किंवा कंपनीशी अजून संपर्क साधलेला नाही," असे ते म्हणाले. हा विजेता लवकरच समोर येईल आणि आपल्या आनंद सर्वांसोबत शेअर करेल, अशी आशा एजन्सीने व्यक्त केली आहे.
सुवर्णसंधी हातची गमावू नका!
एजन्सीच्या संचालकांनी विजेत्याला कळकळीची विनंती देखील केली आहे आहे. ते म्हणाले की, 'जर तिकीटधारकाने वेळेत येऊन बक्षिसावर दावा केला नाही, तर नशिबाने दिलेली ही सुवर्णसंधी त्याच्या हातून निसटू शकते. त्यामुळे, ज्यांनी कोणी रत्न लॉटरी एजन्सीतून दिवाळी बंपरचे तिकीट घेतले असेल, त्यांनी आपले तिकीट तात्काळ तपासावे आणि जर बक्षीस लागले असेल, तर लगेच कंपनीशी संपर्क साधून आपले ११ कोटींचे बक्षीस घेऊन जावे!'