'राहुलजी, विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरमधील स्थिती पाहा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 09:09 AM2019-08-13T09:09:14+5:302019-08-13T09:12:51+5:30

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

Will send you a plane come here then speak Jammu and Kashmir Guv to Rahul Gandhi | 'राहुलजी, विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरमधील स्थिती पाहा'

'राहुलजी, विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरमधील स्थिती पाहा'

Next

जम्मू: कलम 370 वरुन काँग्रेस-भाजपामध्ये अद्यापही शाब्दिक युद्ध सुरुच आहे. काश्मीरमधील परिस्थितीवरुन भाजपाला लक्ष्य करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा करावा. परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो, असं मलिक यांनी म्हटलं. 

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. त्याला मलिक यांनी प्रत्युतर दिलं. सांप्रदायिक दृष्टीकोनातून कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधानं तुम्हाला शोभत नाहीत, असं मलिक म्हणाले. 

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोदींनी पारदर्शकपणा दाखवून या प्रकरणी चिंता व्यक्त करायला हवी, अशी मागणी राहुल यांनी शनिवारी केली होती. कोणत्याही सांप्रदायिक दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. कलम 35 ए आणि कलम 370 मधील बहुतांश तरतुदी सर्वांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. लेह, कारगिल, जम्मू, राजौरी, पूँछ असो वा काश्मीर या निर्णयामागे कोणताही सांप्रदायिक दृष्टीकोन नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याप्रकरणी काल माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली होती. जर जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर या राज्याचा विशेष दर्जा भगवा पार्टीने काढला नसता, असे पी. चिदंबरम म्हणाले होते. भाजपाने बळाच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला. जम्मू-काश्मीर सध्या अस्थिर आहे आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था त्याबाबत वृत्तांकन करत आहेत. परंतु, भारतातील प्रसारमाध्यमं जम्मू-काश्मीरमधील वृत्तांकन करताना दिसत नाहीत. काश्मीरमधील परिस्थिती निवळल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. जर भारतीय प्रसारमाध्यमं काश्मीरमधील अस्थिरतेचं वृत्तांकन करत नसतील तर याचा अर्थ तेथील परिस्थिती स्थिर आहे असा होतो का? असा सवालही पी. चिदंबरम यांनी केला. .  

Web Title: Will send you a plane come here then speak Jammu and Kashmir Guv to Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.