अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले. हे विमान एका वसतिगृहावर कोसळले, या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणमुळे झाला? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या ब्लॅक बॉक्समधून सर्व माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. पण, आता एक नवीन समस्या समोर आली आहे. या अपघातामध्ये या ब्लॅक बॉक्सचेही नुकसान झाले असून माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत.
विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा मानला जातो. या बॉक्समध्ये विमानातील सर्व घटना रेकॉर्ड केलेल्या असतात. यामुळे आता अहमदाबाद विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा आहे. यामुळे आता या ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळण्यासाठी बॉक्स अमेरिकेला पाठवला जाणार आहे. यासाठी तयारी सुरू केली आहे.
भारतीय अधिकारीही अमेरिकेला जाणार
अहमदाबाद विमान अपघातातून सापडलेला ब्लॅक बॉक्स आता डेटा रिकव्हर करण्यासाठी अमेरिकेला पाठवला जाणार आहे. भारत सरकार लवकरच या प्रकरणावर निर्णय घेईल. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅश झालेल्या एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स वॉशिंग्टन डीसीला पाठवला जाईल, तिथे त्याची राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळात चौकशी केली जाईल. या ब्लॅक बॉक्ससोबत एक भारतीय टीम देखील पाठवली जाईल, ही टीम तपासादरम्यान सर्व प्रोटोकॉलचे निरीक्षण करणार आहे.
'ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय?
जेव्हा एखादे विमान कुठेही कोसळते, तेव्हा प्रथम अपघाताचे कारण शोधले जाते. विमान अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक प्रशासन, सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागासारख्या आपत्कालीन सेवा तेथे पोहोचतात. विमान अपघातानंतर, त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी ब्लॅक बॉक्स ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू ठरते.
विमान अपघातानंतर, त्याची चौकशी करण्यासाठी एक विशेष प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केले जाते. जे ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम देखील करते. भारतात, या पथकांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान अपघात तपास ब्युरो पाठवतात.
जेव्हा विमान अपघातात संपूर्ण विमान नष्ट होते, तर ब्लॅक बॉक्स कसा वाचतो? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण, अपघात कितीही मोठा असला तरी, ब्लॅक बॉक्सला काहीही होत नाही, कारण तो टायटॅनियमपासून बनलेला असतो आणि अपघातादरम्यानही तो सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी तो एका मजबूत बॉक्समध्ये ठेवला जातो.