नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरबाबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी मोठा खुलासा केला आहे. दहशतवादी तळांना टार्गेट केल्यानंतर ५ मिनिटांनी पाकिस्तानला माहिती देण्यात आली. हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानला फोन करून जर तुम्ही प्रतिहल्ला केला तर पुढच्या वेळी याहून ताकदीने उत्तर देऊ असं बजावले. भारताचे टार्गेट केवळ दहशतवाद्यांना संपवण्याचं होते असं त्यांनी खुलासा केला.
अलीकडेच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या फ्यूचर वॉर्स अँन्ड वारफेयर कार्यक्रमात सीडीएस अनिल चौहान यांनी सहभाग घेतला. त्यावेळी ते म्हणाले की, डिजीएमओने दहशतवादी तळांना टार्गेट केल्यानंतर ५ मिनिटांनी पाकिस्तानला फोन करून त्याची माहिती दिली होती. आम्ही पाकिस्तानी जनरलला जर तुम्ही पुन्हा हल्ला केला तर यापेक्षाही ताकदीने कठोर उत्तर देऊ असं बजावले. आमच्याकडे पाकिस्तानपेक्षा कित्येक पट जास्त खतरनाक शस्त्रे आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच पहलगाममध्ये जे घडले ते क्रूर होते. हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबासमोर, मुलांसमोर धर्माच्या नावाने गोळ्या घातल्या गेल्या. हे सहन केले जाऊ शकत नाही. त्यातून समाजात द्वेष निर्माण होतो. हा भारतात घडलेला पहिला दहशतवादी हल्ला नाही. देशात याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झालेत. भारत दहशतवादाचा सर्वात जास्त बळी पडलेला आहे. त्यामुळे २० हजाराहून अधिक भारतीय मारले गेलेत असं सीडीएस अनिल चौहान यांनी म्हटलं.
पाकच्या ड्रोन हल्ल्यावर काय बोलले?
दरम्यान, भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हल्ले अयशस्वी केले. आम्हाला ठाऊक होते, आमच्याकडे उत्तम काऊन्टर ड्रोन सिस्टम आहे. दोन्ही देशांनी वेगवेगळ्या प्रकारे सक्षम बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निश्चित ऑपरेशन सिंदूर जोखमीचे होते हे माहिती होते. परंतु आपली जेवढी क्षमता आहे, तेवढी युद्धाच्या मैदानात वापरण्यात आलीच नाही असंही सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितले.