इम्फाळ : मणिपूरमध्ये ४४ आमदार नव्या सरकारच्या स्थापनेसाठी तयार आहेत, असा दावा भाजपचे आमदार थोकचोम राधेश्याम सिंग यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर केला. राधेश्याम सिंग यांच्यासोबत आणखी नऊ आमदार राजभवनात गेले होते.
थोकचोम राधेश्याम सिंग यांनी सांगितले की, ४४ आमदार नवे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याने त्याबाबत काय उपाययोजना करता येईल, याविषयी आम्ही राज्यपालांशी चर्चा केली. सरकार स्थापनेसाठी दावा करण्याबाबतचा निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील. नव्या सरकार स्थापनेला कोणीही विरोध केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मणिपूरमध्ये फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. एन. बिरेन सिंग यांनी जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. (वृत्तसंस्था)
नवी गावे; मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सांगितले की स्थलांतरितांच्या वाढत्या घुसखोरीमुळे मणिपूरमध्ये नवीन वस्त्या, गावे उभी राहात असून, त्यामुळे मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, २०१७ पासून भाजप सरकारने मणिपूरमध्ये विविध ठिकाणी तपासणी करून शेकडो बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली. दरम्यान, थौबल आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांतून चार दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.