नवी दिल्ली - नवनियुक्त लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. पीओकेभारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असे सूचक विधान लष्कप्रमुख मुकुंद नरवणे यांनी केले आहे. लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या मुकुंद नरवणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेण्याविषयी राजकीय नेतृत्वाने केलेल्या विधानाबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, ''संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संकल्प आपल्या संसदेने केलेला आहे. जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू,''
यावेळी लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराच्या सज्जतेविषयीसुद्धा माहिती दिली. ''लष्कर नियंत्रण रेषेवर बऱ्यापैकी सक्रिय आहे. आम्हाला रोज विविध प्रकारची गोपनीय माहिीत मिळत असते. अशा माहितीची गंभीर दखल घेतली जाते. असा सतर्कतेमुळेच BAT या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीच्या कारवाया हाणून पाडण्यात आम्हाला यश मिळाले आहे,''असे त्यांनी सांगितले.