‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 06:44 IST2026-04-13T06:43:46+5:302026-04-13T06:44:41+5:30
West Bengal Assembly Election 2026: ईशान्य भाग देशापासून वेगळा करण्यासाठी ‘टुकडे-टुकडे’ टोळीने धोरणात्मक सिलीगुडी कॉरिडॉर तोडण्याची धमकी दिली होती. तृणमूल काँग्रेसनेही आपल्या तुष्टीकरणाच्या राजकारणानुसार रस्त्यापासून संसदेपर्यंत या लोकांना पाठबळ दिले, हाच या पक्षाचा खरा चेहरा असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.

‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
सिलीगुडी - ईशान्य भाग देशापासून वेगळा करण्यासाठी ‘टुकडे-टुकडे’ टोळीने धोरणात्मक सिलीगुडी कॉरिडॉर तोडण्याची धमकी दिली होती. तृणमूल काँग्रेसनेही आपल्या तुष्टीकरणाच्या राजकारणानुसार रस्त्यापासून संसदेपर्यंत या लोकांना पाठबळ दिले, हाच या पक्षाचा खरा चेहरा असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.
प. बंगालच्या उत्तरेकडील सिलीगुडीत कावाखाली मैदानात आयोजित जाहीर सभेत पंतप्रधानांनी तृणमूल काँग्रेस आदिवासी विरोधी, महिला विरोधी व युवकांच्या विरोधातील पक्ष असल्याचे सांगितले. या पक्षाच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे राज्याची स्थिती विदारक झाल्याचा आरोप त्यांनी केला. सिलीगुडी म्हणजे देशाची सुरक्षा व समृद्धीचा कॉरिडॉर असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
विकासाचा मार्ग
सिक्कीम व सिलीगुडीला जोडणाऱ्या नियोजित रेल्वेमार्गाचे उदाहरण देत त्यांनी विकासकार्याचा दाखला दिला. हा रेल्वे प्रकल्प बंगाल व सिक्कीमला जोडणार नाही, तर या भागात व्यापार व पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. याचा थेट लाभ दार्जिलिंगच्या युवकांना मिळेल. ‘डबल इंजिन’ सरकारला मते दिली तर विकासाचा वेग दुपटीने वाढेल, असे मोदी म्हणाले.