'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 18:48 IST2025-05-31T18:45:54+5:302025-05-31T18:48:31+5:30
दुबईमध्ये केरळ समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांच्या उपस्थितीमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला.

'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
आज सोशल मीडियावर दुबईतील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ दुबईमध्ये केरळ समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा होता. यामध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल या दोघांना आमंत्रित केले होते. त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली, यावेळी मोठ्या उत्साहात या दोघांचे स्वागतही केले. यावरुन नेटकरऱ्यांनी टीका सुरू केल्या. यावरुन मोठा वाद निर्माण झाला. दरम्यान, आता आयोजकांनी स्पष्टीकरण दिले आहे.
२५ मे रोजी पाकिस्तान असोसिएशन दुबईने 'ओरमचुवादुकल सीझन २' नावाची आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. हा कार्यक्रम कोचीन युनिव्हर्सिटी बी.टेक अॅल्युमनी असोसिएशनने आयोजित केला होता. शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांचा कार्यक्रमात येण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यांना पाहून प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि "बूम बूम" अशा घोषणा दिल्या.व्हिडीओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर लोकांनी तीव्र निषेध नोंदवला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शाहित आफ्रीदीने भारताविरोधी विधान केली होती. तरीही आफ्रिदीला कार्यक्रमात कार्यक्रमात आमंत्रित केल्याने लोकांनी संताप व्यक्त केला.
आयोजकांनी स्पष्टीकरण दिले
या वादानंतर CUBAA ने एक अधिकृत निवेदन जारी केले. यामध्ये शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांना आमंत्रित केले नव्हते, असं त्यांनी स्पष्ट केले. निवेदनात म्हटले की, "आमच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती पूर्णपणे अनियोजित होती आणि पूर्व माहितीशिवाय होती. हाताच्या ठशांनी बनवलेल्या सर्वात मोठ्या UAE ध्वजासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स' हा आणखी एक कार्यक्रम देखील त्या दिवशी PAD येथे आयोजित करण्यात आला होता, यामध्ये ते उपस्थित राहण्यासाठी आले होते," असे निवेदनात म्हटले आहे.
'PAD 5 एप्रिल रोजी बुक करण्यात आला होता, त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही राजनैतिक तणाव नव्हता. "गेल्या वर्षीप्रमाणे, यावेळीही आम्ही खर्चाच्या विचारांमुळे तेच ठिकाण निवडले होते आणि शेवटच्या क्षणी ठिकाण बदलणे शक्य नव्हते," असे CUBA ने असेही स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अचानक आफ्रिदी आणि गुल स्टेजवर आले आणि इतक्या कमी वेळात त्यांना थांबवणे किंवा प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते, असे आयोजकांनी सांगितले. "गैरसमज आणि कोणालाही दुखावल्याबद्दल आम्हाला वाईट वाटते. आम्ही भारताच्या सांस्कृतिक आणि समावेशक मूल्यांशी वचनबद्ध आहोत आणि कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, असंही या निवेदनात म्हटले आहे.