मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 06:57 IST2026-04-13T06:55:24+5:302026-04-13T06:57:06+5:30
West Bengal Assembly Election 2026: यंदा प. बंगालमध्ये खऱ्या अर्थाने विजयाचे गणित २९४ पैकी ६५ ते ७० मतदारसंघांतील ठरावीक मतदान केंद्रांवर अवलंबून असणार आहे. कारण, राज्यात मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) या मतदारसंघांतील चित्रच बदलून गेले आहे.

मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
कोलकाता - यंदा प. बंगालमध्ये खऱ्या अर्थाने विजयाचे गणित २९४ पैकी ६५ ते ७० मतदारसंघांतील ठरावीक मतदान केंद्रांवर अवलंबून असणार आहे. कारण, राज्यात मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) या मतदारसंघांतील चित्रच बदलून गेले आहे.
एसआयआरनंतर बंगालमध्ये सुमारे ९१ लाख नावे मतदारयाद्यांतून वगळली आहेत. याचा परिणाम या मतदारसंघांत निश्चित जाणवणार आहे. यात प्रामुख्याने नंदीग्रामपासून भवानीपूरपर्यंतच्या जागा, तसेच उत्तर २४ परगणातील मतुआ पट्टा व मुर्शिदाबाद,मालदाचे अल्पसंख्याकबहुल विभाग निर्णायक ठरतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या भागात विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्य पाहिले तर ते ८,००० ते १५,००० मतांपेक्षा अधिक नव्हते. २०२१ च्या निवडणुकीत तर या भागातून निवडून आलेल्या आमदारांनी १,००० ते ८,००० पेक्षाही कमी फरकाने विजय मिळवला होता.
भाजपचा १७० जागांचा दावा एसआयआरनंतरचा
प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस किमान २१५ जागा मिळवत सत्ता स्थापन करेल, असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करीत आहेत. यात परिणामकारक ठरणारे मतदारसंघ त्यांनी गृहितच धरलेले नाहीत. तर, दुसरीकडे ७७ जागांवरून झेप घेत भाजप १७० जागांचा टप्पा ओलांडेल, असा दावा या पक्षाचे नेते करीत आहेत. यात या नेत्यांनी एसआयआरनंतरच्या परिणामाचा विचार करून गणित मांडलेले दिसते.
असा होऊ शकतो परिणाम
ज्या मतदारसंघांत ठराविक केंद्रांवर एकगठ्ठा मतदान होते अशा केंद्रांवर यंदा अनेक नावे वगळली गेली असल्याने या प्रकारे मतदान
होणार नाही.
त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या
किंवा भाजपच्या आमदारांतील मतांचा फरक निकाल बदलण्याइतपत ठरू शकतो.
११ जिल्हे आणि ७० जागा
एसआयआरचा परिणाम जाणवू शकतील असे ७० मतदारसंघ राज्यातील ११ जिल्ह्यांत विभागले गेले आहेत. २०२१च्या निवडणुकीत या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतांचा फरक ६२३ ते सुमारे ८ हजार मते असा आहे. यात वगळलेल्या नावांचा विचार करता अशा मतदारसंघांत निवडणुकीचे निकाल धक्कादायक
ठरू शकतात.