- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा देशातील जनतेच्या ‘मन की बात’वर तयार होईल व पक्षाने त्याला ‘जन आवाज’ असे नाव दिले आहे. त्याअंतर्गत पक्षाचे नेते देशभर लोकांशी संवाद साधून त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेतील, काँग्रेसकडून त्यांना काय अपेक्षा आहेत व २०१९ मध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली तर त्यांना कशा प्रकारचे सरकार हवे आहे म्हणजेच त्यांची प्राथमिकता काय असेल, कोणत्या प्रकारच्या योजना तयार केल्या जाव्यात, अशी काँग्रेसची भूमिका आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या विचारांना प्रत्यक्ष रूप देण्यासाठी पक्षाचे २२ वरिष्ठ नेते वेगवेगळ्या शहरांत जाऊन लोकांशी थेट संपर्क साधत आहेत. मुंबई, चंदीगढसह अनेक शहरांत याची सुरवातही झाली आहे. एक नोव्हेंबर रोजी नागपूरमध्ये हे नेते असतील. एक आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेने काँग्रेसला व्यापक यश मिळाले आहे व त्यामुळे ही मोहीम अधिक वेगवान बनवण्यात आली आहे व डिसेंबरअखेर ती पूर्ण करण्याचा पक्षाचा विचार आहे. दरम्यान, देशातील लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर ज्या सूचना आणि सल्ला मिळेल त्याला निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट केले जाईल.थेट संवादाच्या या प्रक्रि येला पक्षाने दोन भागांत विभागले आहे. एक बंद खोलीतील संवाद आणि खुली चर्चा. जे लोक थेट संवादात सहभागी होऊ शकणार नाहीत ते व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे पक्ष नेतृत्वाला आपल्या सूचना कळवतील. पक्षाचे नेते पी. चिदम्बरम आणि राजीव गौडा यांनी या उद्देशाने संकेतस्थळही (वेबसाईट) सुरू केले आहे व लोकांना आवाहन केले की ७२९२०८८२४५ या क्रमांकावर आपल्या सूचना व्हॉट्सअॅप कराव्या.इतिहासात असा प्रयोग पहिल्यांदाचपक्षाचे जे २२ नेते वेगवेगळे गट बनवून एकूण १३०-१४० शहरांत ज्या काही सूचना एकत्र करतील त्या येत्या जानेवारी महिन्यात पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट होतील.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने थेट लोकांशी जोडले जाता येईल असा हा काँग्रेसच्या इतिहासात असा प्रयोग पहिल्यांदाच केला जात आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनतेचा आवाज; ज्येष्ठ नेते लोकांशी संपर्क करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:43 IST