व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:28 IST2026-04-07T11:28:23+5:302026-04-07T11:28:56+5:30
प्रयागराज महाकुंभमधील प्रसिद्ध 'IIT बाबा' अभय सिंह विवाहबंधनात अडकले आहेत. इंजिनिअर असलेल्या प्रतीका यांच्याशी त्यांनी लग्न केले.

व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते..
प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये आपल्या अनोख्या आध्यात्मिक प्रवासामुळे रातोरात चर्चेत आलेले ‘आयआयटी बाबा’ उर्फ अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोट्यवधी तरुणांचे स्वप्न असलेली एयरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी आणि लाखांचे पॅकेज सोडून संन्यासाचा मार्ग निवडणारे अभय सिंह आता विवाहबंधनात अडकले आहेत. नुकतेच ते आपली पत्नी प्रतीकासह हरियाणातील सासरौली या आपल्या मूळ गावी पोहोचले, जिथे त्यांच्या पत्नीन आपल्या लग्नामागची कहाणी आणि भविष्यातील 'प्लॅनिंग'चा खुलासा केला.
सद्गुरुंच्या आश्रमात जुळलं सूत
अभय सिंह आणि त्यांची पत्नी प्रतीका यांची पहिली भेट कोईम्बतूर येथील सद्गुरुंच्या 'आदियोगी' आश्रमात झाली होती. प्रतीका या मूळच्या कर्नाटक येथील असून त्यादेखील व्यवसायाने इंजिनिअर आहेत. अध्यात्माची ओढ आणि विचारांची देवाणघेवाण यामुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आले. या जोडप्याने १५ फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पौराणिक 'अघंजर महादेव' मंदिरात धार्मिक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी विशेष विवाह कायद्यांतर्गत कोर्ट मॅरेज करत आपल्या संसाराची अधिकृत सुरुवात केली.
३६ लाखांचे पॅकेज अन् आयआयटीची पदवी
अभय सिंह यांचा आतापर्यंतचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसा आहे. २००८ मध्ये JEE परीक्षेत ७३१ वी रँक मिळवून त्यांनी आयआयटी मुंबईमधून एयरोस्पेस इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर कॅनडामध्ये त्यांना ३६ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले होते. मात्र, भौतिक सुखापेक्षा मनाच्या शांतीचा शोध घेण्यासाठी त्यांनी या करिअरला रामराम ठोकला. अभय यांच्या मते, विज्ञान केवळ बुद्ध्यांक वाढवते, पण कला आणि अध्यात्म माणसाची भावनिक बुद्धिमत्ता संतुलित करतात.
हिमाचलमध्ये उभारणार 'ज्ञानाचं केंद्र'
विवाहानंतर अभय आणि प्रतीका यांनी आपल्या पुढील आयुष्याचे ध्येय निश्चित केले आहे. पत्नी प्रतीका यांनी म्हटले की, ते आता ‘श्री युनिव्हर्सिटी’ या प्रकल्पावर एकत्र काम करत आहेत. प्राचीन ज्ञान आणि साधनेच्या विविध पद्धती एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश आहे. हिमाचलमधील कांगडा येथील दिव्य ऊर्जेने प्रभावित होऊन त्यांनी तिथेच आपले केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठापूर्वक पार पाडत असतानाच जगाच्या कल्याणासाठी आध्यात्मिक कार्य सुरूच ठेवणार असल्याचे या दांपत्याने स्पष्ट केले.