शुक्रवारी अटकेचा डाव हे घटनेचे उल्लंघन
By Admin | Updated: July 5, 2015 23:18 IST2015-07-05T23:18:01+5:302015-07-05T23:18:01+5:30
शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करेपर्यंत कोठडीत ठेवणे हे घटनेचे उल्लंघन असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी अटकेचा डाव हे घटनेचे उल्लंघन
नवी दिल्ली : सोमवारपर्यंत न्यायालयात सुनावणी होत नसल्यामुळे एखाद्याला डावपेच आखत शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करेपर्यंत कोठडीत ठेवणे हे घटनेचे उल्लंघन असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.
बऱ्याचदा शिक्षा संपूनही कैद्यांना कारागृहात ठेवले जाते. तिहार कारागृहात जास्त काळ कैदेत ठेवल्याबद्दल तक्रार स्वीकारण्याची कोणतीही यंत्रणा नाही, त्याबद्दल नुकसानभरपाईही दिली जात नसल्याबद्दल केंद्रीय माहिती आयुक्त (सीआयसी) श्रीधर आचार्यलू यांनी कारागृह अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कोणत्याही कैद्याला मुदतीपेक्षा जास्त काळ कारागृहात ठेवू नये. माहिती अधिकार कायद्यानुसार स्वत:हून त्याबाबत माहिती द्यावी, असेही ते आदेशात म्हणाले. न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेपेक्षा एक दिवसही जास्त काळ कारागृहात ठेवल्याने वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावले जाते.
साधारणपणे शुक्रवारी रात्री अटक करून आरोपींना सोमवारपर्यंत ताब्यात ठेवले जात असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे ताब्यात ठेवणे हे घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन असून, तो गुन्हा ठरतो. कैद्यांना अधिक काळ कैदेत ठेवताना त्यांची कोणतीही तक्रार ऐकून न घेणे, त्यांना त्याबद्दल नुकसानभरपाई न देणे आरटीआयअंतर्गत कैद्यांना माहिती न पुरविणे ही तिहार कारागृह अधिकाऱ्यांची पद्धत चुकीची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीआयसीकडे धाव
> कैदी ओ.पी. गांधी यांनी तिहार कारागृहाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे सीआयसीकडे धाव घेतली होती. त्यांनी आयोगाकडे तिहार कारागृहाने ठोठावलेल्या एकूण शिक्षेपेक्षा चार दिवस जास्त काळ कैदेत ठेवल्याची तक्रार केली होती.
गांधी यांनी तिहार कारागृहात तक्रार स्वीकारण्यासाठी कोणतीही अंतर्गत यंत्रणा नसल्याकडे लक्ष वेधले. त्यावर आचार्यलू यांनी अर्जदाराला चुकीच्या पद्धतीने ताब्यात ठेवल्याबद्दल सनदी किंवा फौजदारी न्यायालयाकडेच दाद मागण्याशिवाय अन्य पर्याय दिसत नसल्याचे नमूद करताना कारागृह अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली. आचार्यलू हे हैदराबादच्या नलसार येथे कायद्याचे प्रोफेसर राहिले आहेत.