पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा दलांनी काल रात्री बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनी भागात लष्कर-ए-तोएबा (LET) चा दहशतवादी जमील अहमद याचं घर उद्ध्वस्त केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली आहेत.
याआधी शनिवारी रात्री सुरक्षा दलांच्या पथकाने दहशतवादी अदनान शफीचं घर पाडलं होतं. अदनान २०२४ मध्ये लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि गेल्या एक वर्षापासून तो सक्रिय होता. काही काळापूर्वीच कुपवाडा येथील सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद याचं घर तीन सेकंदात उडवून दिलं होतं. फारुख सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे आणि तिथून दहशतवादी कारवाया करत आहे.
बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनीतील जमील अहमद आणि जैनापोरा येथील अदनान शफी यांच्याव्यतिरिक्त सुरक्षा दलांनी ज्या दहशतवाद्यांची घरं पाडली त्यात फारूक, अनंतनाग जिल्ह्यातील ठोकरपोरा येथील आदिल अहमद ठोकर, पुलवामा येथील मुरान येथील अहसान उल हक शेख, त्राल येथील आसिफ अहमद शेख, शोपियानमधील छोटीपोरा येथील शाहिद अहमद कुट्टे, त्रालमधील खासीपोरा येथील अमीर नजीर आणि कुलगाममधील मतलहमा येथील जाहिद अहमद घनी यांचा समावेश आहे.
हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. या घटनेमुळे देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली. लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं, ते स्फोट घडवून उडवण्यात आलं आहे. तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला.
"माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
दहशतवाद्याच्या बहिणीचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये तिने न्यूज एजन्सी एएनआयशी संवाद साधला. "माझा एक भाऊ जेलमध्ये आहे आणि दुसरा मुजाहिदीन आहे. मला दोन बहिणी आहेत. काल मी इथे आले तेव्हा मला माझे आईवडील आणि नातेवाईक सापडले नाहीत. मला सांगण्यात आलं की पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दहशतवादी हल्ल्याबद्दल आम्हाला काही माहित नाही. सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी माझ्या भावाला पकडावं. आम्हाला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. आमचं कुटुंब निष्पाप आहे" असं महिलेने म्हटलं आहे.