नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातचं काम गेलं आहे. असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. अनेक ठिकाणी हातावरचं पोट असणाऱ्यांना एक वेळचे जेवण मिळणं देखील कठीण झालं आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली आहे. मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्यांचा अवस्था नेमकी कशी आहे हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भुकेने व्याकूळ झालेला एक तरुण रस्त्यावर सांडलेलं दूध पित असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सुतरखाने येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. लॉकडाऊनमध्ये पोटाची भूक भागवण्यासाठी मिळेल ते अन्न खाण्याच्या प्रयत्न अनेक जण करत आहेत. सुतरखाने येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळ एका दुधवाल्याची सायकल रस्त्यावर घसरून पडली. त्यामुळे त्याचं सर्व दूध रस्त्यावर सांडलं. दूध रस्त्यावर सांडल्यानंतर दूधवाला तेथून निघून गेला. पण त्याचवेळी भुकेनं व्याकुळ झालेल्या तरुण त्या ठिकाणाहून जात होता.
रस्त्यावर सांडलेलं दूध तरुणाने पाहिलं आणि भुकेने व्याकूळ असल्यामुळे तो ते रस्त्यावर सांडलेलं दूध पिऊ लागला. ही घटना स्थानिक लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणासाठी अन्नाची व्यवस्था केली आहे. या तरुणाचा व्हिडीओहा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील लॉकडाऊनमुळे मजुरांवर संकट ओढावलं आहे हातावर पोट भरणाऱ्या लोकांना एकवेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. दरम्यानच्या काळात हजारो कामगार बेरोजगार झाले आहे. त्यामुळे हाताला काम नाही, खिशात पैसा नाही आणि पोटात अन्न नाही अशी अवस्था लोकांची झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला
कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने सात कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन मिळण्यास उशीर झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील सात रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला.