उत्तर प्रदेशात जातीय राजकारणाला सुरुंग
By Admin | Updated: May 17, 2014 04:37 IST2014-05-17T04:37:09+5:302014-05-17T04:37:09+5:30
भाजपाच्या मोदी लाटेने उत्तर प्रदेशातील जातीच्या राजकारणाचे समीकरण संपविले आणि त्याचबरोबर या राजकारणाच्या पायावर मुलायमसिंह आणि मायावती यांनी उभे केलेले किल्लेही ढासळले.

उत्तर प्रदेशात जातीय राजकारणाला सुरुंग
भाजपाच्या मोदी लाटेने उत्तर प्रदेशातील जातीच्या राजकारणाचे समीकरण संपविले आणि त्याचबरोबर या राजकारणाच्या पायावर मुलायमसिंह आणि मायावती यांनी उभे केलेले किल्लेही ढासळले. राममंदिराच्या आंदोलनानंतर भाजपाने या वेळी प्रथमच उत्तर प्रदेशात जोरदार मुसंडी मारून इतर पक्षांची अक्षरश: दाणादाण उडविली आहे. राममंदिर आंदोलनानंतर मुलायमसिंहांनी आपल्या यादवांच्या व्होट बँकेला मुस्लीम व्होट बँकेची जोडणी केली. त्याचा आधार फक्त राममंदिर आणि भाजपाविरोध हाच होता आणि या एकाच मुद्द्यावर मुस्लीम मतपेढी सपाकडे वळली. याचवेळी मायावतींनी आपल्या राजकारणाची पुनर्मांडणी करीत दलित आणि ब्राह्मण असे समीकरण जुळवून सत्ता मिळविली होती आणि गेल्या १० वर्षांत उत्तर प्रदेशाच्या राजकारणाचा जात हाच पाया तयार झाला होता. दलित आणि मुस्लीम ही काँग्रेसची व्होट बँक दुरावली आणि तेथूनच काँग्रेसच्या प्रभावाला ओहोटी लागली. एकेकाळी सर्वांत जास्त जागा जिंकणार्या काँग्रेसला या वेळी केवळ दोन जागा मिळाल्या, त्याही सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याच. अमेठीचा गड कसा राखावा लागला हे आता दिसलेच. भाजपाच्या या नव्या लाटेत मायावतींकडचा ब्राह्मण मतदारसुद्धा सरळपणे भाजपाकडे झुकला. दलित मतांची विभागणी झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी सत्तेवर असणार्या या पक्षाला लोकसभेत खातेही उघडता आले नाही. समाजवादी पार्टीचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. उत्तर प्रदेशात सत्तेवर असतानाही त्यांना केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. याचा अर्थ यादवांची मते फुटली आणि मुस्लिमांनीही या वेळी वेगळा विचार केल्याचे जाणवते. उत्तर प्रदेशातील या तीनही पक्षांचे दिग्गज पराभूत झाले आहेत. एका अर्थाने उत्तर प्रदेशच्या राजकारणाची नव्याने मांडणी सुरू झाली आहे.