Uttar Pradesh Assembly Election: बडबोले बोले बहौत, किये जादा कुछ नहीं..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 10:00 AM2022-01-16T10:00:42+5:302022-01-16T10:01:21+5:30

युपीचं इलेक्शन अगदी जवळ आलेलं, राज्यभर चुनावी माहौल होता.केंद्रातलं मोदी सरकार जेमतेम तीन वर्षेच जुनं हाेतं.

Uttar Pradesh Assembly Election tough fight between bjp and sp | Uttar Pradesh Assembly Election: बडबोले बोले बहौत, किये जादा कुछ नहीं..

Uttar Pradesh Assembly Election: बडबोले बोले बहौत, किये जादा कुछ नहीं..

Next

- मेघना ढोके, संपादक, डिजिटल सखी, लोकमत (meghana.dhoke@lokmat.com) 

१ जानेवारी २०१७ 
सायंकाळ होता होता अयोध्येत पोहोचले. मिट्ट काळोख. भयानक थंडी. जागोजागी पेटलेले अलाव. (म्हणजे शेकोट्या.)  हात शेकत निवांत गप्पा मारत बसलेली माणसं. पोटाला चिकटलेली बाळं घेऊन  उड्या मारत फिरणारी लेकुरवाळी माकडं. ‘शहरी’ हॉटेलात  इलेक्शनचे दिवस असल्यानं टीव्हीवर चुनावी डिबेट जोरजोरात सुरू होती. आदल्याच दिवशी अखिलेश यादव आणि मुलायमसिंग या पिता-पुत्रांचा कलह युपीने जाहीर पाहिला होता. चेक इन करता करता कानावर वाक्य आलं, ‘जो अपने बाप का ना हुआ, वो किसी और का क्या होगा, अखिलेस तो गया!’ रिसेप्शनवरच्या त्या विशीतल्या तरुणाला विचारलं, अखिलेस गया तो आएगा कौन? 

झर्रकन त्याचा चेहरा बदलला, त्यानं उत्तर दिलं, ‘सूरज की रोशनी जितना तो साफ है, देस में मोदी, प्रदेस में योगी’! 
युपीचं इलेक्शन अगदी जवळ आलेलं, राज्यभर चुनावी माहौल होता.केंद्रातलं मोदी सरकार जेमतेम तीन वर्षेच जुनं हाेतं. जात-धर्म-भाई-भतीजा राजनीती सोडून युपीची जनता ‘बिकास’ या नव्या शब्दाला भुलताना दिसत होती. अलाहाबादमध्येच एका सायकल रिक्षावाल्यानं सांगितलं होतं, ‘हम तो है बहनजीकेही साथ, लेकीन इसबार मोदीजी पे भरोसा है, युपी में बिकास हो की ना हाे..?’

त्या काळात देशभरात पत्रपंडितांनी केलेली भाकीतं युपीनं चुकवली. कारण त्या काळात युपीच्या गावखेड्यातल्याही तरुण मुलांना मोदी आणि पुढे योगींच्या रूपात  ‘प्रदेस’ का ‘बिकास’ दिसत होता. त्यांनी योगीना प्रचंड बहुमत दिलं. पुढं २०१९ मध्येही मोंदीच्याच पारड्यात आपली मतं टाकली.लखनौ ते बिहारचं बोधी गया या पट्टयात प्रवास करत असताना ‘बिकास’ हा शब्द सतत कानावर येत होता. अयोध्येतही माणसं उघड सांगत, मंदिर तो बनेगाही,  इंडस्ट्री भी तो लगे.. बिकास भी तो होना चाहिए यहां...

  ३ सप्टेंबर २०२१
‘लोकमत दीपोत्सव’साठी अयोध्या कव्हर करायला म्हणून व्हाया लखनौ अयोध्येत दहा दिवस तळ ठोकायचं ठरलं. श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात गुंतलेल्या अयोध्येतली “माणसं” शोधून पाहण्यासाठी त्यांच्या गावात राहायचं ठरवलं होतं. शरयूकाठावरचं जगणं समजून घेत अयोध्येत राहणाऱ्या माणसांना, घाटा-घाटांवर भेटत फिरत होतो.

निवडणूक पुढ्यात होतीच. प्रदेस में योगी सरकारचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आलेला. कुणाशीही बोला, राजनीती पायात येत होतीच. हे युपीचं खास वैशिष्ट्य. पानटपरीवाला, सायकलरिक्षावाला, दुकानदार, नदीकाठचा नावाडीही राजकीय विश्लेषकाच्या थाटात बोलतो. कौनसी योजना कौन साल बहन मायावतीने दिलायी थी, कौन काम कल्याणसिंहजीके टाइमसे अटका पडा है, कौन सडक अखिलेस बनाये, योगीजीके कार्यकाल में कौनसा काम पूर्ण हुआ... आपल्या आमदार-खासदारांनीच नाही तर नगसेवकांनीही काय केलं, त्यांचे कोणत्या बाहुबलीशी कसे संबंध आहेत, त्यांची ब्लॅक-व्हाइट आमदनी किती, पुलिस किस की जेब में है... हे असं सगळं आकडेवारीसह सांगितलं जातं. वरून खात्री देतात माणसं,  आप फॅक्ट चेक करालो, हम जो बोले वो झूठ निकलना असंभव है..

अयोध्येत चायटपरीवाले अग्रवाल चाचा तोंडात गुटखा असल्यानं  तोंड सहसा कमीच उघडत. त्यांना विचारलं, ‘किस और है हवा का रुख?’ ते गुटखा थुंकत एकच वाक्य म्हणाले, “बडबोले बोले बहौत किये जादा कुछ नहीं..”
याहून जास्त त्यांनाही ‘औरत’शी बोलण्यात रस नव्हता.

या जगात ‘औरत’ या प्राण्याला काडीची किंमत नाही, तिनं तोंड उघडणं पाप, सवाल करणं म्हणजे बवाल. बायाबापड्या अखंड राबतात. रेशन दुकानात तासंतास रांगा लावून घुंघट ओढून उभ्या राहतात. कुटुंब त्याच चालवतात. पण त्यांना ना फारसं कुटुंब सत्तेत स्थान आहे ना निर्णयसत्तेत. आता बदल एवढाच की निदान अच्छी ससूरालच्या मोहापोटी तरी घरवाले मुलीला शिकवतात. अशा राज्यात बहन मायावती मुख्यमंत्री होतात, आपल्या पक्षात सोशल इंजिनीअरिंगचा वेगळा प्रयोग करतात, त्यांच्यापुढे  बाहुबली नेतेही नमतं घेतात हे सारं फार गुंतागुंतीचं.

गरिबी जागोजागी. रिकाम्या हातात स्मार्ट फोन घेऊन बसलेली तरुण पोरं ठायीठायी दिसतात. स्थानिक जाणकार सांगतात, आमच्या पोरांना काही ध्येयं नाहीत, गुड्डू भय्या, पप्पू भय्या, मुन्ना भय्या यांच्या मागे काळे गॉगल्स लावून फिरणं एवढंच काय ते! तो भय्या पुढे जातो, कारण तो अनेकदा उच्च जात असतो, कुणाचा तरी भाईभतीजा असतो. कार्यकर्ते चाळिशी उलटल्यावर पोटापाण्याकडे वळतात. .बिकास या स्वप्नाची चर्चा फार, वर्तमान सगळा जात-जमातीच्या कडवट गुंत्यात अडकलेला. प्रत्यक्षात पायाखाली रस्ता नाही, घरपोच पाण्याचा नळ नाही, उत्पन्न कमी... स्थलांतर जास्त... हे सारं तसंच. वर्षानुवर्षं. अगदी अयोध्येतही. सगळीकडे कचऱ्याचे डीग, तो चिवडून त्यातून अन्न खाणारी हावरट माकडं, रस्त्यात खड्डे. तरी लोक आनंदानं सांगतात, अभी सफाई हो रही है. पहले तो अंधेरा था, अब रात को लाइट है, बिकास में टाइम लगता है...

वाट पाहण्याची इतकी अजब ताकद कशी इथल्या माणसांत याचंच नवल वाटतं. गोष्टी हळूहळू बदलतात, सावकाश बदल होतात यावर इथल्या समाजाचा असा काही विश्वास की सामान्य माणसांपासून पत्रकारांपर्यंत जो तो आपल्यालाच सांगतो, ‘आप के महाराष्ट्र के चश्मे से नहीं, यूपीवाले नजरियेसे देखिए... अब बहोत कुछ बदला है यहां... पहले जैसा नहीं रहा...’

या प्रवासात बिहारच्या सासारामजवळच्या छोट्या गावातून आलेली पूनम भेटली. हे कुटुंब भूमिहीन. पोट भरायला अयोध्येत आली. नवरा पेंटर ठेकेदाराच्या हाताखाली काम करतो. दोन मुलं. म्हणाली, ‘यहा बहौत सुकून है, बहोत माॅडर्न लोग है, औरत को भी काम देते है... हमारे यहां तो दलित औरत जैसे कुछ नहीं...’

ती बिहारच्या नजरेतून उत्तर प्रदेश पाहत होती, 
मी महाराष्ट्राच्या... असा तुकड्यातुकड्यातच भेटणारा उत्तर प्रदेश हा एक चकवा आहे. त्या चकव्यात म्हणूनच आजवर राजकीय पक्ष निवडणुकीत चीतपट होत आले आहेत.
- आणि तीच तर या प्रदेशाची खासियत आहे...

Web Title: Uttar Pradesh Assembly Election tough fight between bjp and sp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.