स्पर्धेच्या युगात यश मिळविण्यासाठी लोकांना अनेक वेळा अपयशाला सामोरं जावं लागतं. लोक अपयशातून शिकतात आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जातात. शेवटी ते यशस्वी होतात आणि इतरांसाठीही आदर्श बनतात. कोडरमाच्या चांदवाडा ब्लॉकमधील पथलगड्डा येथील रहिवासी पवन कुमार याने असंच काहीसं केलं आहे, २३ वेळा अपयश आल्यानंतरही त्याने हार मानली नाही आणि आता मोठं यश मिळवलं आहे.
पथलगड्डा येथील शेतकरी रामदेव यादव आणि संजू देवी यांचा एकुलता एक मुलगा पवन कुमार याचं प्राथमिक शिक्षण गावातील शुभ सोनिया शाळेत झालं. त्यानंतर त्याने सैनिक स्कूल तिलैया येथून सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये मॅट्रिक, २०१९ मध्ये इंटरमिजिएट आणि २०२२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या झाकीर हुसेन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
२३ वेळा नापास झाल्यानंतरही हार मानली नाही
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एनडीएची परीक्षाही दिली. ज्यामध्ये तो चार वेळा नापास झाला. त्याने आठ वेळा कंबाइंड डिफेंस सर्व्हिसेस परीक्षा, तीन वेळा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा आणि आठ वेळा एफसीएटी परीक्षा दिली. परंतु मुलाखतीत पोहोचल्यानंतर त्याचं मेरिट लिस्टमध्ये यायचं नाही. अशाप्रकारे त्याला एकूण २३ वेळा अपयशाला सामोरं जावं लागलं. त्याने हार मानली नाही आणि ४ वर्षे कठोर परिश्रम करत राहिला. आता यश मिळालं आहे. सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स(CAPF) परीक्षेत ३१५ वा रँक मिळवून तो असिस्टंट कमांडंट झाला आहे.
सेल्फ स्टडीवर केलं लक्ष केंद्रित
पवन कुमारने लोकल १८ शी संवाद साधताना सांगितलं की, गरीब शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याने हजारीबागसारख्या छोट्या शहरात बहिणीच्या घरी राहून परीक्षेची तयारी केली. याच काळात ऑनलाईन स्टडी मटेरियल, लष्करी सेवेशी संबंधित मित्रांचं मार्गदर्शन आणि सेल्फ स्टडी यावर अधिक लक्ष केंद्रित केलं. सकाळी लवकर उठून ९ वाजेपर्यंत अभ्यास करणं, नंतर नाश्ता करणं आणि विश्रांती घेणं, नंतर पुन्हा अभ्यास करणं आणि त्यानंतर संध्याकाळी जिमला जाणं हा त्याचा रोजचा दिनक्रम असायचा.