ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि. ८ - तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २००८ - ०९ च्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या नादात महागाई गगनाला भिडली व परिणामी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत युपीएचा पराभव झाला असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडले आहे.
चेन्नईतील एका महाविद्यालयात अर्थसंकल्पसंदर्भात संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पी. चिदंबरम यांनी यूपीएचा व वाढत्या महागाईचे कारण यावर भाष्य केले. चिदंबरम म्हणता, २००८ - ०९मध्ये यूपीएतील तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थव्यवस्थेला गति देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज दिले. पण यामुळे फिस्कल कन्सोलिडेशन नॉर्म्सचे उल्लंघन झाले. याचा फटका म्हणजे महागाई गगनाला भिडली, रुपयांचा भावही घसरला असे चिदंबरम यांनी नमूद केले. अखेरीस २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला नाकारले व यूपीएचा पराभव झाला असेही त्यांनी म्हटले आहे.