सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:28 IST2026-04-11T12:27:00+5:302026-04-11T12:28:01+5:30
PM Modi And Rahul Gandhi: अभूतपूर्व दृश्याने देशाचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि थेट राहुल गांधींशी संवादाला सुरुवात केली.

सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
PM Modi And Rahul Gandhi: महात्मा जोतीबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विशताब्दी वर्ष उत्साहात साजरे केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने एक विशेष लेख लिहिला आणि त्यांच्या कार्याचे स्मरण केले. महात्मा फुले यांना संसद परिसरात आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी चक्क एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
संसद परिसरात महात्मा फुले यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, जेपी नड्डा, अर्जुन मेघवाल यांच्यासह अनेक नेते, मान्यवरांना पुष्प अर्पण करून आंदरांजली अर्पण केली. यावेळी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याच मनमोकळेपणाने चर्चा रंगली. या दृश्याने संपूर्ण देश सुखावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा...
महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद परिसरात दाखल झाले. यावेळी जेपी नड्डा, अर्जुन मेघवाल, माजी राज्यसभा सदस्य हरिवंश, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. या स्वागताच्या वेळेस राहुल गांधीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरळ राहुल गांधी यांच्याकडे जात आपुलकीने विचारपूस केली. तसेच सुमारे दीड एक मिनिट पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाली. दोन्ही नेते अगदी मनमोकळेपणाने एकमेकांशी चर्चा करताना पाहायला मिळाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची माहिती अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. परंतु, तेथे उपस्थित असलेले अधिकारी, नेते, जनता या दृश्यामुळे सुखावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे म्हटले जात आहे.