अभूतपूर्व शपथग्रहण
By Admin | Updated: May 27, 2014 06:32 IST2014-05-27T05:15:39+5:302014-05-27T06:32:02+5:30
न भूतो विजय मिळविलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी देशाचा कारभार पुढील पाच वर्षांसाठी हाती घेतला.

अभूतपूर्व शपथग्रहण
नवी दिल्ली : ‘सब का साथ, सब का विकास’ या आश्वासक मंत्राने लोकसभा निवडणुकीत न भूतो विजय मिळविलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी देशाचा कारभार पुढील पाच वर्षांसाठी हाती घेतला. राष्ट्रपती भवनाच्या पुढील बाजूच्या प्रांगणात, मावळत्या सूर्याच्या साक्षीने झालेल्या अभूतपूर्व आणि दिमाखदार समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना भारताचे १५वे पंतप्रधान म्हणून शपथ दिली. जगातील सर्वांत मोठ्या अशा भारतीय लोकशाहीतील हे क्रांतिकारी स्थित्यंतर प्रत्यक्ष अनुभवण्यास पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह ‘सार्क’ संघटनेतील आठ देशांच्या राष्ट्रप्रमुखांखेरीज देश-विदेशातील चार हजार मान्यवर उपस्थित होते. ‘किमान सरकार व कमाल शासन’ या वचनाला जागून मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा आकार तूर्तास तरी छोटेखानी ठेवला आहे. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ असल्याने नियमानुसार १५ टक्के अर्थात ८२ सदस्यांचे मंत्रिमंडळ असू शकते. पण मोदींसोबत २३ कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभाराचे १० राज्यमंत्री व ११ राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआ-२चे मंत्रिमंडळ तब्बल ७१ जणांचे होते. देशाची अनेक राज्ये व आघाडीतील बहुसंख्य मित्रपक्षांना मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात प्रतिनिधित्व देता न आल्याने येत्या काही आठवड्यांत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणे अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेले नव्हते.