दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान जखमी; लहान मुलांवरील दगडफेकीचे गुन्हे मागे घेणार - राजनाथ सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:04 IST2018-06-08T00:04:12+5:302018-06-08T00:04:12+5:30
केरान क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी गुरूवारी केलेल्या गोळीबारामध्ये दोन जवान जखमी झाले.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान जखमी; लहान मुलांवरील दगडफेकीचे गुन्हे मागे घेणार - राजनाथ सिंह
श्रीनगर : केरान क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी गुरूवारी केलेल्या गोळीबारामध्ये दोन जवान जखमी झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आले असतानाच हा हल्ला झाला. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गोळीबार करणाºया दहशतवाद्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
राजनाथसिंह म्हणाले की, काश्मीरच्या युवकांची दिशाभूल करण्यात येत आहे. या युवकांनी विध्वंसक मार्ग पत्करू नये. त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काही योजना राबवित असून युवकांनी त्याचा लाभ घ्यावा. मुलांची दिशाभूल सहजी करता येते ही गोष्ट आम्हाला माहीत आहे. त्यामुळेच अशा अल्पवयीनांवर नोंदविलेले दगडफेकीचे गुन्हे मागे घेण्याचा आदेश सरकारने दिला आहे. काश्मीरचे भवितव्य व चेहरामोहरा आम्ही बदलणारच, असा निर्धार राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. काश्मीरमधील युवकांनी लष्करामध्ये भरती व्हावे, म्हणून सरकार त्यांना मदत करणार आहे. मात्र या राज्यातील युवकांनी कोणत्याही गैरकृत्यांत सहभागी होऊ नये, असेही ते म्हणाले.
राजनाथसिंह यांच्या दौºयामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक
कडक करण्यात आल्याने
त्याचा गुरुवारी श्रीनगरच्या दक्षिण भागातील वाहतूकीवर परिणाम झाला होता. (वृत्तसंस्था)
फुटीर गटांशी चर्चा होणार?
रमझानच्या काळात केंद्र सरकारने लागू केलेल्या एकतर्फी शस्त्रसंधीनंतर राज्यातील स्थितीचा आढावा राजनाथसिंह घेणार आहेत. फुटीरतावादी गटांशी चर्चा करण्याची तयारीही केंद्राने दाखविली आहे. मात्र जम्मू-काश्मीर हा वादग्रस्त भाग आहे हे सरकारने जाहीर केले आणि आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही सरकारशी चर्चा करू असे फुटीरतावादी नेत्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे काश्मीरच्या या दौºयात राजनाथसिंह यांच्याशी हे नेते चर्चा करतील का याविषयीही उत्सुकता आहे.