निलंगा/ किल्लारी (जि. लातूर) : गावाकडे निघालेल्या तिघांची दुचाकी आणि कारच्या भीषण अपघात औसा-लामजना मार्गावरील दावतपूर पाटीजवळ रविवारी रात्री झाला. त्यात दोघा चुलतभावांसह एका मित्राचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सरवडी (ता. निलंगा) गावावर शोककळा पसरली आहे.
सोमनाथ दयानंद हिप्परगे (२२), अभिजित शाहुराज इंगळे (२३), दिगंबर दत्ता इंगळे (२७, सर्वजण रा. सरवडी, ता. निलंगा) अशी मृत तिघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील सरवडी येथील अभिजित इंगळे, दिगंबर इंगळे हे दोघे चुलतभाऊ आणि त्यांचा मित्र सोमनाथ हिप्परगे हे रविवारी रात्री दुचाकीवरून औसा-लामजना मार्गाने गावाकडे निघाले होते. ते दावतपूर पाटी ते वाघोली पाटीदरम्यान पोहोचले असता, भरधाव वेगातील कारने समोरून जोराची धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पोलिसांत नोंद झाली आहे.
जिवलग मित्रांच्या मृत्युमुळे सरवडी गावावर शोककळाअभिजित, दिगंबर व सोमनाथ तिघे जिवलग मित्र होते. मित्रांचा मृत्यू झाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली. या तिघांचे पार्थिव गावात आणले असता संपूर्ण गाव हळहळत होते. तिघांवर अंत्यसंस्कार झाले.