मरकजमध्ये सहभागी झालेल्या 1,548 पैकी 441 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे - केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 19:13 IST2020-03-31T19:03:39+5:302020-03-31T19:13:16+5:30
दिल्लीमध्ये 97 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी 24 जण मरकजमधील आहेत. यापैकी 5 जण बरेहोऊन घरी गेले असून दोघांचा मृत्यू झाला आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

मरकजमध्ये सहभागी झालेल्या 1,548 पैकी 441 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे - केजरीवाल
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करण्यात येत आहे. यातच दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीग लोकांच्या मरकजमधून तब्बल 1548 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी तब्बल 441 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
महत्वाची गोष्ट म्हमणजे दिल्लीमध्ये 97 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी 24 जण मरकजमधील आहेत. यापैकी 5 जण बरेहोऊन घरी गेले असून दोघांचा मृत्यू झाला आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
मरकजप्रकरणी केजरीवालांनी व्यक्त केली नाराजी -
मुख्यमंत्री अरविंदज केजरीवाल म्हणाले, समोर आलेल्या कोरोनाग्रस्तांच्या प्रकरणात अद्याप लोकल कम्यूनिटी ट्रांसमिशन झालेले नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. मात्र, मरकजमधून ज्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यातील जास्तीत जास्त लोक पॉझिटिव्ह असल्याची शक्यता आहे. मरकजमध्ये 12-13 मार्चदरम्यान बाहेरून आलेले लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तेथून ज्यांना काढण्यात आले त्यापैकी 24 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दिल्ली सरकारने सोमवारी उपराज्यपालांना मरकजप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात यावी, असे पत्र पाठविले आहे. मला आशा आहे, की लवकरात लवकर याप्रकरणी कारवाईचे आदेश देतील. याप्रकरणात कुण्या अधिकाऱ्याकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. जे लोक या कार्यक्रमात होते त्यांनातर कोरोनाचा धोका आहेच, पण जे लोक त्यांच्यासंपर्कात आले त्यांनाही कोरोनाचा धोका वाढला आहे, असे केजरीवाल म्हणाले.
आपण बेजबाबदारपणे वागलो तर अडचणी वाढतील -
आतापर्यंत 1548 जणांना मरकजमधून काढण्यात आले आहे. त्यापैकी 1127 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अशाप्रकारे लोकांनी एकत्र येणे हा बेजबाबदारपणा आहे. यातील लोक देशाच्या इतर भागांतही गेले आहेत. याचा तेथेही परिणाम होऊ शकतो. मंदिर, मशिदी, गुरुद्वारा बंद असताना, अशा प्रकारे का वागण्यात आले. जर आपण बेजबाबदारपणे वागलो तर अडचणी अधिक वाढतील, असेही केजरीवाल म्हणाले