Jaipur SMS: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतववाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांना एअर स्ट्राईक करुन लक्ष्य केलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये राजधानी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून संपूर्ण एसएमएस स्टेडियम ताबडतोब रिकामे केले. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथक देखील स्टेडियमच्या प्रत्येक भागाची तपासणी करत आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ही माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आणि स्टेडियम रिकामे करण्यात आले. बॉम्ब स्क्वॉडची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतरएसएमएस स्टेडियममध्ये शोध मोहीम राबवली जात आहे. काही दिवसांपूर्वी या स्टेडियमध्ये आयपीएलचा सामना खेळवण्यात आला होता. गुरुवारी सकाळी ९.१३ वाजताच्या सुमारास स्टेडियममध्ये नियोजित स्फोट होण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली. ईमेलमध्ये ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देण्यात आला.
धमकीच्या ईमेलनंतर स्टेडियमच्या प्रत्येक भागाची तपासणी केली जात आहे. आतापर्यंतच्या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेले नाही. धमकीचा ईमेल 'पाकिस्तान जेके वेब' नावाच्या मेल आयडीवरून आला आहे. "ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी, आम्ही तुमच्या स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट करू. शक्य असेल तर सर्वांना वाचवा," असं या मेलमध्ये म्हटलं आहे. या बॉम्बस्फोटाला ईमेल पाठवणाऱ्याने 'प्रभाकर दिविज' असे नाव दिले आहे.
ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर राजस्थानमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असताना ही धमकी देण्यात आली आहे. सीमेजवळील राज्य असल्याने राजस्थानमध्ये सर्व रेल्वे आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गस्त वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सीमेवरील ५ जिल्ह्यांमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.