आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला सात विकेटने हरवून शानदार विजय मिळवला. मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये उडालेल्या लष्करी संघर्षानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यातील भारताच्या विजयाने क्रिकेट प्रेमिंना तर खुश केलेच. शिवाय, या सामन्याने राजकारणही तापले होते. यातच आता, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भारताने सर्वत्र विजय मिळवायला हवा, मग क्रिकेटचा सामना असो अथवा दहशतवाद्यांना प्रत्युत्तर. पण जे आपल्या मुलींना विधवा आणि मुलांना अनाथ बनवत आहेत, त्यांच्या सोबत खेळणे, हे विजयाचे परिमाण असू शकत नाही. हा विजय असू शकत नाही. दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत, २६ भारतीय नागरिकांचे जीवन अधिक मौल्यवान आहेत की क्रिकेट सामन्यातून मिळवलेले कोट्यवधी रुपये? असा प्रश्नही ओवेसी यांनी यावेळी सरकारला केला.
भाजप आणि देशभक्ती -दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या, 'पानी और खून एक साथ नहीं बह सकते, आतंक और बातचीत संभव नहीं', या विधानाची आठवण करून देत ओवेसी म्हणाले, "भाजप आपल्या देशभक्तीच्या धोरणासंदर्भात क्रिकेट येताच तडजोड करतो. ते म्हणाले, ''BCCI ला एका क्रिकेट सामन्यातून किती पैसे मिळतील? ₹2,000 करोड़, ₹3,000 करोड़? आम्हाला सांगा, आपल्या 26 नागरिकांचा जीव अधिक आहे की, पैसा? हे भाजपने सांगायला हवे.
पहलगाम दहशतवादी हल्ला - गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान तसेच पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले. या लष्करी कारवाईत क्षेपणास्त्रे, ड्रोन आदींचा वापर करण्यात आला. यात पाकिस्तानचे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.