नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सुरक्षा प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला आहे. CRPF ने याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी कुणालाही न सांगता मागील ९ महिन्यात ६ वेळा परदेश दौऱ्यावर गेलेत. या काळात ते इटली, व्हिएतनाम, दुबई, कतार, लंडन आणि मलेशिया दौरा केला असं त्यांनी सांगितले.
CRPF ने मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधींनाही हे पत्र पाठवले आहे. अशाप्रकारची चूक VVIP सुरक्षेला कमकुवत करते. त्याशिवाय यातून धोक्याचा सामनाही करावा लागू शकतो असं या पत्रात म्हटलं आहे. याआधीही सीआरपीएफने हा मुद्दा उचलला होता. राहुल गांधी यांना एडवान्स सिक्युरिटी लाइजन कव्हरसह हाइएस्ट लेवलची झेड प्लस सिक्युरिटी आहे. झेड प्लस सिक्युरिटीत ५५ सुरक्षा जवान तैनात असतात. त्यात १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. त्याशिवाय इतर सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस असतात.
येलो बुक प्रोटोकॉलनुसार उच्चस्तरीय श्रेणीतील सुरक्षा मिळालेल्या लोकांना त्यांच्या हालचालींबाबत सुरक्षा विंगला आधी सूचना द्यावी लागते. जेणेकरून पुरेसी व्यवस्था निश्चित केली जाईल. त्यात परदेश दौऱ्यांचाही समावेश असतो. CRPF चे व्हीव्हीआयपी सिक्युरिटी हेड सुनील जून यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले. त्यात राहुल गांधी त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेत नाहीत. बहुतांश वेळा ते कुणालाही न सांगता परदेश दौऱ्यावर जातात असं त्यांनी सांगितले. ३० डिसेंबर ते ९ जानेवारी ते इटलीत होते. १२ ते १७ मार्च व्हिएतनाम, १७ ते २३ एप्रिल दुबई, ११ ते १८ जून कतार, २५ जून ते ६ जुलै लंडन, ४ ते ८ सप्टेंबर मलेशियासारख्या परदेश दौऱ्यावर ते गेले होते.
दरम्यान, इतकेच नाही तर राहुल गांधी यांनी २०२० ते आतापर्यंत ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. ज्यात पक्षाच्या भारत जोडो यात्रेचा दिल्लीतील दौऱ्याचाही उल्लेख आहे. केंद्र सरकारने २०१९ साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना देण्यात आलेली एसपीजी सुरक्षा काढून घेतली होती. त्याऐवजी सीआरपीएफ सुरक्षा देण्यात आली होती. SPG सुरक्षा गांधी कुटुंबाकडे जवळपास ३ दशके होती.