‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 07:54 IST2025-09-20T07:53:21+5:302025-09-20T07:54:42+5:30
निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले. कोणत्याही व्यक्तीला ऑनलाइनद्वारे एखाद्याचे नाव वगळण्याचा अधिकार दिलेला नाही असे आयोगाने स्पष्ट केले.

‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
नवी दिल्ली : चुनाव का चौकीदार जागता राहा, चोरी देखता राहा, चोरों को बचाता राहा (निवडणुकीचा चौकीदार जागा राहिला, चोरी पाहिली, चोरांना वाचवले) अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा केली आहे. त्यांनी शुक्रवारी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, ‘सकाळी ४ वाजता उठून, ३६ सेकंदात दोन मतदार हटवा, मग पुन्हा झोपा-हीच मतांची चोरी आहे!’
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारावर राहुल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी दाखवून ते म्हणाले होते की, काँग्रेस समर्थकांची नावे मतदारयाद्यांतून पद्धतशीररीत्या वगळण्यात येत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले. कोणत्याही व्यक्तीला ऑनलाइनद्वारे एखाद्याचे नाव वगळण्याचा अधिकार दिलेला नाही असे आयोगाने स्पष्ट केले.
कर्नाटकातील आळंदमध्ये ६,०१८ मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६,८५० जणांची नावे सॉफ्टवेअर वापरून नोंदविण्याचा गैरप्रकार घडल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये असे गैरप्रकार घडले असून त्याचे पुरावे आहेत असेही ते म्हणाले.
देशातील जेन झी हे संविधानाचे रक्षण करतील
राहुल गांधी यांनी ३६ सेकंदाचा एक व्हिडीओही शेअर केला. त्यात मतचोरी कशी चालते हे उलगडून दाखविण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
देशातील युवक, विद्यार्थी, जनरेशन झी हे संविधानाचे रक्षण करतील, लोकशाही वाचवतील, मतांची चोरी थांबवतील असे त्यांनी म्हटले आहे.