पश्चिम बंगालमधील पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हटले
By Admin | Updated: August 8, 2014 03:14 IST2014-08-08T03:14:34+5:302014-08-08T03:14:34+5:30
पश्चिम बंगालमधील आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख चक्क दहशतवादी म्हणून करण्यात आल्याची संतप्त घटना समोर आली आङे.

पश्चिम बंगालमधील पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हटले
>ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. ८ - पश्चिम बंगालमधील आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख चक्क दहशतवादी म्हणून करण्यात आल्याची संतप्त घटना समोर आली आङे. विशेष म्हणजे पाठपुस्तक मंडळाच्या पदाधिका-यांनी याचे समर्थनही केले असून त्यावेळची परिस्थिती मांडण्यासाठी या शब्दांचा वापर केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमधील आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात रिव्हॉल्यूशनरी टेररिझम हा धडा आहे. या धड्यात शहीद खुदीराम बोस, जतिंद्रनाथ मुखर्जी आणि प्रफुल्ल चाकी या स्वातंत्रसैनिकांना जहाल आणि दहशतवादी म्हणून संबोधिले आहे. '१९०८ नंतर स्वातंत्र्यलढ्यातील काही लोकांनी दहशतवादी मार्ग स्वीकारला. त्यांनी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ले केले. या दहशतवादी गटाचे कट समोर येऊ लागल्यावर त्याचे समाजावर परिणाम झाले. काही जण त्यांच्या विचारांशी सहमत असले तरी अनेकांना हा मार्ग रुचला नव्हता' असा उल्लेख या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हटल्याने पश्चिम बंगालमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. खुदीराम बोस, चाकी यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हणणारे उद्या सुभाषचंद्र बोस यांनाही दहशतवादी म्हणतील का ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हणून संबोधित करुन केवळ सत्यस्थिती बदलण्यात आली नाही. तर यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचला आहे असे इतिहासतज्ज्ञ अतिश दासगुप्ता यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिका-याने धड्यात दहशतवादी शब्दाचा वापर हा त्यावेळची परिस्थिती मांडण्यासाठी केला आहे असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र इतिहासातील घडामोडींविषयी शद्बप्रयोग करताना पाठ्यपुस्तक मंडळाने सावधपणे काम करायला पाहिजे असे जाणकारांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने याविषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
या घटनेनंतर पाठ्यपुस्तक मंडळाने इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची तयारीही सुरु केल्याचे समजते. सध्याच्या इतिहासातील धडे हे काही अंशी डाव्या विचारांकडे झुकतात. अभ्यासक्रमात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्यासारख्या व्यक्तींवरील धडे आणण्याची गरज असल्याचे एका अधिका-याने सांगितले.