तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा सामना करण्यामध्ये त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं. हैदराबादमध्ये जय हिंद यात्रेपूर्वी एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री रेवंत यांनी टीकास्त्र सोडलं. "देश आपले शहीद जवान आणि नागरिकांच्या मृत्यूवर शोक करत असताना भाजपा युद्धाचा वापर राजकीय खेळी म्हणून करत आहे. चार दिवसांच्या युद्धानंतर काय झालं? कोणी आत्मसमर्पण केलं? आम्हाला माहित नाही" असं म्हटलं आहे.
युद्धविरामाच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक न बोलावल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि युद्ध सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती याची आठवण करून दिली. रेवंत रेड्डी म्हणाले की, "तुम्हाला आमची गरज असताना तुम्ही आम्हाला बोलावलं. आम्ही सैन्यासोबत उभे राहिलो. पण युद्धविराम करताना तुम्ही आम्हाला सामील केलं नाही. पाकिस्तानने किती राफेल जेट विमानं नष्ट केली? याबद्दल कोणीही का बोलत नाही? नागरिक आणि राजकीय पक्षांची वारंवार मागणी असूनही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यात सरकार अपयशी ठरत आहे."
"जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणला असता"
"राहुल गांधींनी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळली असती. जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणला असता. मोदी हे १००० रुपयांच्या नोटेसारखे आहेत. आपल्याला राहुल गांधींसारखे नेते हवे आहेत. मोदी आपल्यासाठी कधीही युद्ध जिंकू शकत नाहीत. पंतप्रधान म्हणून फक्त राहुल गांधीच हे करू शकतात" असं रेड्डी यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षादरम्यान काँग्रेसने सरकारला पूर्ण पाठिंबा दिला होता. रेड्डी यांनी भाजपाच्या तिरंगा रॅलीवरही हल्लाबोल केला आणि ही रॅली खरोखरच पहलगाम हल्ल्यातील लोक आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ आयोजित केली जात आहे का? असा सवाल विचारला.
"युद्ध म्हणजे फक्त भाषण देणं नाही"
मोदी सरकारची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाशी करताना रेड्डी म्हणाले, "युद्ध म्हणजे फक्त भाषण देणं नाही. धैर्य, दृढनिश्चय आणि रणनीती आहे. अमेरिकेने पाकिस्तानला पाठिंबा दिला तेव्हाही इंदिरा गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि भारताने १९७१ चे युद्ध जिंकलं. पण आज चीनने आपल्या ४,००० चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे, सूर्यपेटचे आमचे जवान कर्नल सुरेश बाबू यांना मारलं आहे आणि आपले पंतप्रधान गप्प आहेत."