"पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती"; मृतांच्या नातेवाईकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:04 PM2024-04-16T18:04:08+5:302024-04-16T18:05:17+5:30

झेलम नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.

srinagar boat capsized in jhelum river 6 people dead including three from one family | "पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती"; मृतांच्या नातेवाईकांचा संताप

"पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती"; मृतांच्या नातेवाईकांचा संताप

श्रीनगरमधील झेलम नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. लाल चौकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर झेलम नदीच्या काठावर गंडबल गाव वसले आहे. मृतांमध्ये 45 वर्षीय फैयाज मलिक यांची जुळी मुलं आणि पत्नी फिरदौसा यांचा समावेश आहे. मुदसीर आणि तनवीर अशी मुलांची नावं होती. पूल वेळीच बांधला असता तर ही दुर्घटना घडली नसती असं म्हणत मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. 

19 लोक बोटीने झेलम नदी पार करत होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट उलटली. बोट उलटल्यानंतर एका पुलावर आदळली आणि बुडाली. अपघातानंतर चार जणांना वाचवण्यात यश आले. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाने आणखी 15 लोकांना पाण्यातून बाहेर काढले. याच दरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. 

नदीत अजूनही काही लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि लष्कराचे बचाव पथक उपस्थित आहे. जनतेचा रोष प्रशासन आणि नेत्यांवर आहे. संतापाचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरापासून या परिसरात बांधकाम सुरू असलेला पूल आहे. हा एक फूटब्रिज असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे काम 2013 मध्ये सुरू झाले आणि 2016 पर्यंत संथ गतीने सुरू राहिले. आता पुलाचे काम अचानक बंद झाले. लाल चौकाजवळ बोटीतून मुलं व पालकांची ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बोट केबलने जोडलेली होती. ओढल्यावर बोट एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ लागली. सपोर्ट केबल तुटल्याने बोट उलटली. बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या पिलरला धडकल्याने बोटीचा अपघात झाला. हा पूल वेळीच बांधला असता तर ही दुर्घटना घडली नसती असं नागरिकांनी म्हटलं आहे. 

तीन महिन्यांत लाल चौकाला स्मार्ट सिटी बनवलं. जगाला दाखवण्यासाठी लाखो किमतीचे दिवे आणि टाइल्स लावल्या. काश्मीर जगासाठी स्वर्ग आहे पण आपल्यासाठी ते नरक आहे असं स्थानिक तरुणाने म्हटलं आहे. अपघाताच्या वेळी बोटीत नेमके किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. श्रीनगरचे आयुक्त बिलाल मोहिउद्दीन यांनी सांगितले की, बोट दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

Web Title: srinagar boat capsized in jhelum river 6 people dead including three from one family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.