धक्कादायक! चीनने अरुणाचलमधील भारताच्या हद्दीत वसवला गाव, सॅटेलाइट फोटोंमधूल झालं उघड
By बाळकृष्ण परब | Updated: January 18, 2021 17:01 IST2021-01-18T16:57:54+5:302021-01-18T17:01:40+5:30
Arunachal Pradesh News : अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी करून चक्क एक गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक! चीनने अरुणाचलमधील भारताच्या हद्दीत वसवला गाव, सॅटेलाइट फोटोंमधूल झालं उघड
नवी दिल्ली - लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत असलेल्या सीमेवर चीनकडून सातत्याने कुरापती काढण्यात येत असतात. या भागात सीमारेषा निश्चित नसल्याने चिनी सैन्याकडून या भागात सातत्याने घुसखोरी होत असते. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधीलभारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी करून चक्क एक गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचं वृत्त एनडीटीव्हीने प्रसारित केले आहे. सॅटेलाइट फोटोंमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा दावा करण्यात आला आहे.
सॅटेलाइट फोटोत दिसत असलेल्या बांधकामानुसार चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करून एक नवा गाव वसवला आहे. या गावामध्ये सुमारे १०१ घरे असल्याचे दिसत आहेत. हे सॅटेलाइट फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत तज्ज्ञांना विचारले असता त्यांनी जा छायाचित्रांना दुजोरा दिला. तसेच हे गाव भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून साडे चार किलोमीटर आत वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाब भारताची चिंता वाढवणारी आहे.
हे गाव अरुणाचल प्रदेशमधील अप्पर सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. या भागातील सीमेवरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. तसेच या भागाला सशस्त्र लढाईची जागा म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. हे गाव हिमालयाच्या पूर्व भागात अशावेळी वसवण्यात आले आहे ज्याच्या काही काळापूर्वी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक चकमक झाली होती.