एसबीआयचे फर्मान, 70 हजार कर्मचाऱ्यांकडून ओव्हरटाईमचे पैसे परत घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 15:56 IST2018-07-17T15:55:07+5:302018-07-17T15:56:02+5:30
नोटबंदी काळात देशातील सर्वच सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम करत देशातील नागरिकांची एकप्रकारे मदतच केली. पण..

एसबीआयचे फर्मान, 70 हजार कर्मचाऱ्यांकडून ओव्हरटाईमचे पैसे परत घेणार
नवी दिल्ली - नोटबंदी काळात देशातील सर्वच सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम करत देशातील नागरिकांची एकप्रकारे मदतच केली. मात्र, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या 70 हजार कर्मचाऱ्यांकडे ओव्हरटाईमसाठी देण्यात आलेल्या पैशांची रक्कम परत मागितली आहे. ज्या पाच बँकांचे एसबीआयमध्ये विलिनीकरण करण्यात आले, त्या पाच बँकांचे हे सर्व कर्मचारी आहेत.
एसबीआयकडून ज्यावेळी कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमसाठी निर्णय घेण्यात आला. त्यावेळी, या बँकांचे विलिनीकरण झाले नव्हते, असे एसबीआयने म्हटले आहे. नोटबंदीवेळी जे कर्मचारी एसबीआय शाखांमध्ये कार्यरत होते, केवळ त्यांनाच या ओव्हरटाईमचा मोबदला देण्यात येणार होता, असे ठरल्याचे एसबीआयने म्हटले आहे. दरम्यान, नोटबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेण्यात आला होता. तर स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपूर या बँकांचे 1 एप्रिल 2017 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात विलिनीकरण करण्यात आले आहे.
एसबीआयने 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीत सायंकाळी 7 वाजल्यानंतरही काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार मे 2017 च्या दरम्यान ओव्हरटाईमचा मोबदला दिला होता. मात्र, आता संलग्नित बँकांच्या कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम परत मागविण्यात येत आहे. विशेष म्हणेज या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमाची रक्कम मिळून 1 वर्षापेक्षाही जास्त काळ लोटला आहे.