अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. यावरून भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानचा उल्लेख दलाल असा केला होता. जयशंकर यांनी केलेला हा उल्लेख पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. तसेच पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी एस. जयशंकर यांच्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. जयशंकर यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. तसेच अशा प्रकारचा विचार पूर्ण प्रदेशाला प्रभावित करू शकतो, असे खार यांनी म्हटले आहे.
इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये इराण युद्धातील पाकिस्तानच्या कथित मध्यस्थतेचा विषय आला तेव्हा एस. जयशंकर यांनी भारत या प्रक्रियेत नाही आहे. कारण आम्ही दलाल देश नाही आहोत, असे सांगितले होते. त्यावरच आता हिना रब्बानी यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी जयशंकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत टीका केली आहे. हा संपूर्ण भाग असे लोक आणि त्यांच्या राजकीय नाट्यामुळे ओलीस धरला गेला आहे, हे पाहून दु:ख होत आहे, असे रब्बानी खार म्हणाल्या.
हिना रब्बानी यांच्याआधी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी शुक्रवारी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. आम्ही भारताने केलेल्या वक्तव्याचं खंडन करतो. अशा प्रकारची वक्तव्ये भारताची हताशा दर्शवत आहेत. तसेच जेव्हा तर्क कमी पडतात, तेव्हा अपशब्दांचा आधार घेतला जातो, असेही ते म्हणाले होते.