Rajasthan Accident: राजस्थानची राजधानी जयपूरमधून अपघाताची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका भरधाव ट्रक आणि जीपची समोरासमोर जोरदारर टक्कर झाली, ज्यात लग्न करुन परतणाऱ्या वधूसह ५ जणांचा मृत्यू झाला, तर नवऱ्या मुलासह ८ जण गंभीर जखमी झाले. हे सर्वजण मध्य प्रदेशातून परतत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजता जयपूर ग्रामीण भागातील जमवारमगडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर हा अपघात झाला. जीप आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. टक्कर इतकी भीषण होती की, जीपचा चुराडा झाला. याच जीपमधून वधू-वरासह कुटुंबातील सुमारे १४-१५ सदस्य प्रवास करत होते.
अपघातानंतर उडाला गोंधळ अपघानंतर जीपमधील प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून जवळच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. तसेच, अपघाताची माहिती रायसर पोलिस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच, पोलिस तातडीने अपघातस्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना जीपमधून बाहेर काढले.
सर्व जखमींना चांदवाजी येथील एनआयएमएस रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवदाम्पत्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यमुळे दोन्ही बाजुच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.