संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा छडा लावत मेघालय पोलिसांनी या प्रकरणी राजा याची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज आणि इतर चार आरोपींना अटक केली होती. सुरुवातीपासून लव्ह ट्रँगलमधून ही हत्या घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी आता यावर पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे. लग्नानंतर काही दिवसांमध्येच सोनम हिच्या मनात पती राजाबद्दल एवढं शत्रूत्व निर्माण झालं असावं याबाबत पोलिसांच्या मनात शंका आहे. राज्याचे डीजीपी इधाशिशा नोग्रांग यांनी याबाबतची माहिती देत या प्रकरणाला नवं वळण दिलं आहे. त्यामुळे आता राजा सूर्यवंशी हत्या प्रकरणाचा तपास हा केवळ लव्ह ट्रँगलपुरता मर्यादित राहणार नाही. तर त्यामध्ये इतर मुद्द्यांचाही विचार होणार आहे.
याबाबत डीजीपी नोंग्रांग यांनी सांगितले की, लग्नानंतर लगेचच सोनम हिच्या मनात पती राजा याच्याबाबत टोकाचा राग निर्माण होण आम्हाला थोडं विचित्रच वाटतंय. त्यामुळे आम्ही प्रेम प्रकरणासह इतर सर्व संभाव्य कारणांचाही विचार करत आहोत. या प्रकरणी पोलिसांकडे आतापर्यंत सबळ पुरावे आहेत. मात्र अजून काही गोष्टी स्पष्ट होणे बाकी आहे, असेही नोग्रांग यांनी सांगितले.
मेघालय पोलिसांकडून खालील मुद्द्यांवर तपास केंद्रित करण्यात आला आहे.-सोनम आणि राज यांच्या मागे आणखी कुणी व्यक्ती आहे का?- हत्या करण्याचा हेतू मालमत्ता, विमा आणि कुठला अन्य लाभ हे कारण आहे का?- सोनमलासुद्धा अन्य कुणी व्यक्ती ब्लॅकमेल करत होती का? - ही हत्या क्राईम ऑफ पॅशन नव्हे तर क्राईम ऑफ पर्सनल पॉलिटिक्स होती का?
मध्य प्रदेशमधील इंदूर येथील रहिवासी असलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह ११ मे रोजी झाला होता. त्यानंतर २१ मे रोजी हे दोघेही हनिमूनसाठी मेघालयमध्ये गेले होते. २३ मे रोजी सोहरा येथील नोंग्रियात गावातील एका होमस्टेमधून चेक आऊट केल्यानंतर राजा रघुवंशा आणि सोनम हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यावर हत्येला दहा दिवस उलटल्यानंतर राजा याचा मृतदेह दरीत सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास केल्यावर या हत्येमागे पत्नी सोनम, तिचा प्रियकर राज आणि त्याच्या काही मित्रांचा हात असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याच्या तीन मित्रांना अटक केली होती.