Rahul Gandhi on RSS : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी(24 मार्च) INDIA आघाडीच्या विद्यार्थी संघटनांच्या निदर्शनात सामील होण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार निशाणा साधला. 'आरएसएस शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या विचारात आहे,' अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
राहुल गांधी पुढे म्हणतात, 'आरएसएस शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या विचारात आहे. आज भारतातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये आरएसएसचे कुलगुरू आहेत. लवकरच राज्यांतील विद्यापीठांचे कुलगुरूही आरएसएसचे असतील. यंत्रणा त्यांच्या हातात पडली तर सर्व काही संपेल. देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कुंभमेळ्यावर बोलले होते. कुंभमेळ्यावर बोलणे चांगले आहे, पण त्यांनी भविष्याबद्दलही बोलले पाहिजे. त्यांनी बेरोजगारीविरुद्ध बोलावे. तुमच्या सरकारने या देशातील तरुणांना बेरोजगार केले, तुम्ही त्याबद्दल बोलले पाहिजे.'
'देशात आज कोणालाही रोजगार मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या हिताशी आम्ही तडजोड करणार नाही. आपण सर्वांनी मिळून सरकारचा सामना केला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण व्यवस्थेवर बोलले पाहिजे. पण त्यांची यंत्रणा अंबानी-अदानी यांच्यासाठी आहे. इंडिया आघाडी या नात्याने आमच्यात विचारधारेचे काही मतभेद असू शकतात पण आमचे उद्दिष्ट एकच आहे. आम्ही आरएसएस आणि त्याची विचारधारा नष्ट करण्यासाठी काम करू,' असा निर्धार राहुल गांधींनी बोलून दाखवला.