एफएसआय वाढीचा हेतू परवडणारी घरे हवा - तिजोरी भरू नका: विविध क्षेत्रातून अपेक्षा व्यक्त
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
संदीप प्रधान

एफएसआय वाढीचा हेतू परवडणारी घरे हवा - तिजोरी भरू नका: विविध क्षेत्रातून अपेक्षा व्यक्त
स दीप प्रधानमुंबई- महापालिकेच्या विकास आराखड्यातील प्रिमीयम आकारून विभागनिहाय चटईक्षेत्र निर्देशांक (व्हेरिएबल एफएसआय)देण्याच्या तरतुदीचा हेतू हा सर्वसामान्यांना बृहन्मुंबईत परवडणारी घरे मिळावीत हा असावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच प्रिमीयमच्या माध्यमातून केवळ महापालिकेची तिजोरी भरण्याचेच काम होईल, अशी शंका बांधकाम व्यावसायिक, आर्कीटेक्ट, निवृत्त नोकरशहा यांनी व्यक्त केली आहे.बृहन्मुंबईतील चटईक्षेत्र निर्देशांक आतापर्यंत शहरात १.३३ व उपनगरात १ इतका राहिला. त्याचबरोबर एफएसआय वाढीचा प्रस्ताव चर्चेला आणणे म्हणजे घोटाळा करण्याची मुहूर्तमेढ रोवणे असा सार्वत्रिक समज होता. विकास आराखड्यातच एफएसआय वाढीचे सूतोवाच केल्याने या धाडसी निर्णयाचे स्वागत होत आहे. मात्र परवडणारी घरे बांधणार्यांकडून प्रिमीयम आकारू नये. तसे केल्यास घरांच्या किमती किमान २० टक्क्यांनी कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष सुनील मंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांकरिता परवडणारी ६० चौ.मी. क्षेत्रफळाची घरे बांधणार्यांकरिता प्रिमीयम आकारू नये. केवळ उत्पन्न मिळवणे हा एफएसआय वाढीमागील हेतू नको. शिवाय एफएसआय वाढवताना पायाभूत सुविधा अंातरराष्ट्रीय दर्जाच्या असणे गरजेचे आहे. ओंकार डेव्हलपर्सचे संचालक कौशिक मोरे यांनी कोणत्या आधारावर वाढीव एफएसआय दिला जाणार हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत याबाबत काही स्पष्ट मतप्रदर्शन करता येणार नाही, असे सांगितले. सध्या मेट्रो स्थानकाजवळ ४ एफएसआय दिला जात आहे. तो दुप्पट करताना जमिनीचे मालक, विकासक व स्थानिक रहिवाशी यांना कसा लाभ होणार ते स्पष्ट झाले पाहिजे.सध्या फंजीबल एफएसआयमुळे ५.४ एफएसआय प्राप्त होतो. त्यामुळे प्रत्यक्षात एफएसआय वाढ २० टक्के आहे. मात्र हे करताना हेतू महापालिकेचे उत्पन्न प्रिमीयम आकारणीतून वाढवणे हा आहे की लोकांना घरे देऊन घरांच्या किमती किमान २० टक्क्यांनी कमी करणे हा आहे हे स्पष्ट झाले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध आर्कीटेक्ट संदीप अमृतकर यांनी व्यक्त केले. एफएसआय वाढवताना पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले तर फार मोठा गोंधळ होईल, असे ते म्हणाले.नगरविकास खात्यातून निवृत्त झालेल्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एफएसआय वाढीच्या महापालिकेच्या धैर्याचे कौतुक केले मात्र रस्ते, पाणी, मलनि:सारण व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशारा दिला..........................................................