मुंबई - जागतिक पातळीवर क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटविणारा भारतीय क्रिकेट संघाला आता राजकीय मैदानात उतरविण्यास सुरुवात झाली आहे. आयसीसीच्या नियमानुसार भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग बदलून भगवा करण्यात आला आहे. मात्र यावरून राजकारण तापले असून पंतप्रधान मोदींना देश भगवा करायचा असून त्यासाठीच जर्सीचा रंग बदलल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला.
इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. यावर समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान मोदींना देश भगवा करायचा आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भगवी करण्यात आल्याचा आरोप अबु आझमी यांनी केला आहे. तसेच देशाच्या तिरंग्यात मुस्लिमांचा हिरवा रंग देखील आहे. त्यासोबत आणखी रंग आहेत. मग भारतीय संघाच्या जर्सीसाठी भगवाच रंग का असा सवाल आझमी यांनी केली.
दरम्यान आझमी यांच्या आक्षेपाला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या जर्सीवरून विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली. तसेच विरोधकांकडे चर्चेत राहण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीचा विषय काढला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
आयसीसीच्या नियमांनुसार दोन संघ एकाच रंगाची जर्सी परिधान करून खेळू शकत नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची लढत यजमान इंग्लंडसोबत असून इंग्लंड संघाच्या जर्सीचा रंग देखील निळाच आहे. त्यामुळे इंग्लंड विरोधात खेळताना भारतीय संघ निळ्या जर्सी एवेजी भगव्या रंगाची जर्सी घालण्याची शक्यता आहे.