Mahakumbh Stampede PM Modi News: १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी रोजी दुर्दैवी घटना घडली. यात दहापेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाला असून, ५० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. मध्यरात्री चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोललो आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही मोदींनी केली आहे.
मी राज्य सरकारच्या संपर्कात -पंतप्रधान मोदी
"प्रयागराज महाकुंभमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी आपल्या नातेवाईकांना गमावले आहे, त्यांच्या प्रति मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो. त्याचबरोबर मी सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वोतोपरी मदत करण्याचे काम करत आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी चर्चा केली आहे आणि सातत्याने राज्य सरकारच्या संपर्कात आहे", अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दिली आहे.
केंद्रीय मंत्र्यांना जास्त रेल्वे गाड्या चावलण्याची विनंती
महाकुंभमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा केली. प्रयागराजवरून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या सोडण्यात याव्या, अशी मागणी केली.
प्रयागराजमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना सहजपणे लवकरात लवकर शहराबाहेर पडता यावे, यासाठी जास्त रेल्वेगाड्या चालवण्यात याव्यात, अशी विनंती योगींनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले की, प्रत्येक चार मिनिटाला एक रेल्वे गाडी प्रयागराज येत आहे. त्याचबरोबर प्रयागराजवरून रवाना होत आहे. ३६० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या प्रयागराजवरून चालवण्याला जात आहेत.
संगम नोजकडे जाण्यासाठी तोडले बॅरिकेट्स -योगी आदित्यनाथ
दरम्यान, संगम नोज म्हणजे त्रिवेणी संगम ज्याठिकाणी आहे, तिथे स्नान करण्यासाठी भाविक जाण्याचा प्रयत्न करत होते. पण, बॅरिकेट्स लावलेले होते. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर संगम नोजच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी भाविकांनी बॅरिकेट्स तोडले आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.