UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:17 IST2025-07-12T13:10:47+5:302025-07-12T13:17:17+5:30
महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा १ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
PM Modi UNESCO 12 Forts: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यासह ११, तर तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा यात समावेश आहे. १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. 'प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे', अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्वराज्याच्या पाऊल खुणा असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या कार्याची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील ११, तर देशातील १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. या निर्णयावर शिवप्रेमी आनंद व्यक्त करत आहेत. पंतप्रधान मोदींनाही आपल्या भावना व्यक्त करणे अनावर झाले.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
मराठा मिलिटरी लँडस्केप्समधील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "प्रत्येक भारतीय ह्या सन्मानाने आनंदित झाला आहे. या मराठा मिलिटरी लँडस्केप्समध्ये १२ भव्य किल्ल्यांचा समावेश आहे. यापैकी ११ महाराष्ट्रात आहेत, १ तामिळनाडूमध्ये आहे."
वाचा >>१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
'शिवाजी महाराज आपल्याला प्रेरणा देतात'
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो. कोणत्याही अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात", अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.
मोदींनी जनतेला केले आवाहन
"मी सर्वांना आवाहन करतो की, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या", असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्ताने जनतेला केले आहे.
जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आलेले ते १२ किल्ले कोणते?
युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये ज्या किल्ल्यांचा समावेश केला आहे, त्यामध्ये किल्ले शिवनेरी, स्वराज्याची राजधानी राजगड व रायगड यांच्यासह साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील, तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ला आहे.