PM Narendra Modi at Adampur Aairbase : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर पंतप्रधान मोदींनी काल(12 मे) राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला थेट इशाराही दिला होता. त्यानंतर आता आज (13 मे) पहाटे पीएम मोदी अचानक आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी लष्कराच्या जवानांची भेट घेऊन ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा आणि त्यांचे अभिनंदन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सैनिकांशी 6 मे च्या रात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दलही चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देणे खूप खास मानले जात आहे. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानने हा एअरबेस उडवल्याचा दावा केला होता. पण, आता स्वतः पीएम मोदी येथे पोहोचल्यामुळे पाकिस्तानच्या खोट्या दाव्याची पोलखोल झाली आहे. पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहेत.
या बैठकीची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, "आज सकाळी एएफएस आदमपूरला भेट दिली आणि आपल्या शूर हवाई योद्ध्यांची भेट घेतली. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या जवानांसोबत वेळ घालवणे अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे, त्यासाठी भारत नेहमीच त्यांचे आभारी राहील."
भारतासाठी खूप खास आहे आदमपूर एअरबेस
पंजाबमधील आदमपूर एअरबेस हा भारतीय हवाई दलाच्या मिग-29 विमानांचा तळ आहे. येथील स्क्वाड्रनला ब्लॅक आर्चर म्हणून ओळखले जाते. आदमपूर एअरबेस हे भारताच्या उत्तरेकडील सीमेजवळील मोक्याच्या हवाई संरक्षण ठिकाणांपैकी एक आहे. हे एअरबेस भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात आहे. चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर जलद प्रत्युत्तर देण्यासाठी हे ठिकाण महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदमपूर एअरबेसला भेट केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक नव्हती, तर ती सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी खूप महत्वाची होती.
विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याबद्दल कामीलीच गुप्तता पाळण्यात आली होती. याबद्दल कोणतेही माध्यम कव्हरेज किंवा औपचारिक माहिती देण्यात आली नाही. यावरुन हे स्पष्ट होते की, मोदींचा हा दौरा केवळ सैनिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि तेथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी महत्वाचा होता. यावेळी प्रधानांसोबत एअर चीफ मार्शल एपी सिंग देखील उपस्थित होते.