"ही आमची तिसरीच टर्म आहे"; लोकसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 21:11 IST2025-02-04T21:10:38+5:302025-02-04T21:11:08+5:30
संसदेत भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील विजयाचा मोठा दावा केला आहे.

"ही आमची तिसरीच टर्म आहे"; लोकसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर केला मोठा दावा
PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणारील प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाषणाच्या शेवटी ही आमची तिसरीच टर्म असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आगामी काळातही हे काम सुरूच राहणार असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना इशाराच दिला. पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बाक वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच आमच्या त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. कोणत्याही देशाचा विकास होण्यासाठी २० ते २५ वर्षांचा कालावधी पुरेसा असतो असं म्हणत ही आमची तिसरीच टर्म आहे असं म्हटलं. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींनी भविष्यातील विजयाचा मोठा दावा केल्याचे म्हटलं जात आहे.
"विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज देश मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. हे फक्त सरकारचे स्वप्न नसून प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. जगातील अनेक देशांनी २०-२५ वर्षांत हे केले आहे. भारतात लोकसंख्या, लोकशाही आहे, मग आपण विकास का करू शकत नाही? आपण २०४७ पर्यंत हे करत राहू. आम्हाला अजून मोठी उद्दिष्टे साध्य करायची आहेत आणि आम्ही ते करू. ही आमची फक्त तिसरी टर्म आहे. देशाच्या गरजेनुसार भारत विकसित करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे काम करणार आहोत," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशाच्या विकासासाठी सर्व पक्ष, सर्व नेते आणि सर्व देशवासीयांनी एकत्र येण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले. "सर्व पक्ष आणि नेत्यांची स्वतःची विचारसरणी असेल पण देशापेक्षा मोठे काहीही नाही. जेव्हा या देशाचा विकास होईल तेव्हा आपल्या भावी पिढ्या म्हणतील की २०२५ मध्ये संसद अशी बसली होती की तिथे बसलेला प्रत्येक खासदार विकसित भारतासाठी काम करत होता," असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.