भरपूर धान्यसाठा, घाबरण्याचे कारण नाही -जेटली
By Admin | Updated: June 4, 2015 23:18 IST2015-06-04T23:18:52+5:302015-06-04T23:18:52+5:30
अपुऱ्या मान्सूनमुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होईल किंवा महागाई वाढेल असा निष्कर्ष काढून अतिशयोक्तीपूर्ण चित्र उभे करणे अयोग्य आहे.

भरपूर धान्यसाठा, घाबरण्याचे कारण नाही -जेटली
नवी दिल्ली : अपुऱ्या मान्सूनमुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होईल किंवा महागाई वाढेल असा निष्कर्ष काढून अतिशयोक्तीपूर्ण चित्र उभे करणे अयोग्य आहे. देशात कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्याजोगा धान्याचा मुबलक साठा असल्यामुळे घाबरण्याजोगी कुठलीही परिस्थिती नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी स्पष्ट
केले.
हवामान विभागाने यंदा अपुऱ्या पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर गेल्या ४८ तासांत अतिशय निराशाजनक स्थिती निर्माण होईल असे चित्र उभे केले जात असल्यामुळे या मुद्यावर अर्थमंत्रालयाचे मत व्यक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या तीन दिवसांत शेअर बाजार कोसळला पण तो काही कल (ट्रेंड) म्हणता येणार नाही. विशेषत: अप्रत्यक्ष कर हा मुख्य निर्देशक असून या करवसुलीत मोठी वाढ झाली आहे. देशाच्या अन्य भागात मान्सून सर्वसामान्य राहणार असून वायव्य भागात सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याने फटका बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र प्रत्यक्षात धान्य उत्पादनावर फार मोठा परिणाम होणार नाही, कारण या भागात चांगल्याप्रकारे सिंचनाची सुविधा आहे, असेही ते म्हणाले.
जेटली म्हणाले, विपर्यस्तपणे अंदाज वर्तवला जात असल्याचे आढळून येते. मान्सूनची भौगोलिक विभागणी आणि पावसाचा कालवधी ही बाबही महत्त्वपूर्ण ठरते. हवामान विभागाने मंगळवारी दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर रिझर्व्ह बँकेने महागाईवर अंकुश ठेवण्यासाठी आकस्मिक योजना तयार ठेवण्याचा सल्ला दिला होता. सेन्सेक्स १०३५.५७ अंकांनी कोसळल्याची बाबही याच अंदाजाशी जोडली गेली.