दीड लाख कोटींचा पीडीएस घोटाळा
By Admin | Updated: July 5, 2015 04:43 IST2015-07-05T03:57:28+5:302015-07-05T04:43:45+5:30
महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीच्या(भाजपा)सरकारला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा छत्तीसगडकडे वळविला आहे. मुख्यमंत्री रमणसिंग

दीड लाख कोटींचा पीडीएस घोटाळा
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीच्या(भाजपा)सरकारला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा छत्तीसगडकडे वळविला आहे. मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या संगनमताने राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीत (पीडीएस) १ लाख ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसने रमण सरकारवर लावला आहे.
देशातील हा सर्वात मोठा पीडीएस घोटाळा असल्याचा या पक्षाचा दावा आहे.
काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी शनिवारी यासंदर्भात कागदोपत्री पुरावे सादर करताना सांगितले की, छत्तीसगड सरकारने एक रुपया किलो तांदूळ देण्याच्या आड तांदूळ गिरणी मालकांसोबत हजारो कोटी रुपयांची कमाई होऊ शकेल असे तंत्र विकसित केले आहे. मीठ,चणा, रॉकेल, गहू आदींच्या खरेदीच्या माध्यमाने नोटा छपाईचे यंत्र सुरू करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाडीत जप्त केलेल्या दस्तऐवजांवरून या आरोपांची पुष्टी केली जाऊ शकते.
३६ कार्यालयांमधील धाडसत्रात ३ कोटी ६४ लाखांवर रक्कम जप्त करण्यात आली आहे. यावेळी मिळालेल्या नोंदवह्णा आणि इतर कागदपत्रांमध्ये ३,००० कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तपास संस्थेने शिवशंकर भट्टकडून ही डायरी जप्त केली होती. ही एकच डायरी नाही तर अरविंद ध्रुव यांच्या डायरीतूनही अनेक भंडाफोड होत आहेत.
या भ्रष्टाचारात रमणसिंग, त्यांच्या पत्नी वीणा सिंग, साळी रेणुका सिंग, श्रीबहादूर थापा, के.के. बारीक, राजेश मुदत, पन्नुलाल आणि केदार आदी लोक सामील असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
मुख्यमंत्री रमणसिंग आणि त्यांच्या कुटुंबाचा बचाव करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे माकन यांनी सांगितले. काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून, भाजपाश्रेष्ठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.