नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी निदर्शने होत असताना बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंद पुकारला आहे. सीएए, एनआरसी आणि ईव्हिएमविरोधात हा बंद आहे तर दिल्लीच्या जंतरमंतरवर या कायद्याविरोधात निषेध आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते तपन बोस यांनी भारतीय लष्कराबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना तपन बोस म्हणाले की, पाकिस्तान आपला शत्रू राष्ट्र नाही. भारत आणि पाकिस्तानमधलं सरकार एकसारखं आहे. त्याचसोबत भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्कर एकसारखं आहे. पाकिस्तानी लष्कर त्यांच्या माणसांना मारतं तर भारतीय लष्कर आपल्या माणसांना मारतं. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात काहीच फरक नाही असं ते बोलले आहेत.
मात्र तपन बोस यांच्या विधानावर सोशल मीडियात अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तपन बोस यांचे वक्तव्य भारतीय लष्कराचा अपमान करणारे आहे. पाकिस्तान शत्रूराष्ट्र नाही तर भारतात दहशतवादी हल्ले करणारे कोण आहेत? अशा विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरजील इमामनं या व्यक्तीने देशद्रोही विधान केल्यानं तो चर्चेत आला होता. त्यानं ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून वेगळे करण्याची भाषा केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शरजीलच्या विरोधात देशद्रोह आणि धार्मिक तेढ वाढवण्यासह अनेक गंभीर आरोप करत अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल केलं गेलं होतं. त्याला मंगळवारी बिहारच्या जहानाबादमधून अटक करण्यात आली. तत्पूर्वी पोलिसांनी त्याचा भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.
शरजील हा बिहारच्या जहानाबादमधला रहिवासी आहे. त्याचे वडील अकबर इमाम जेडीयूचे नेते राहिले आहेत. अकबर इमाम यांनी जेडीयूच्या तिकिटावरून जहानाबादवरून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. शरजील कारण नसताना फसवलं गेल्याचा आरोप त्याच्या काकांनी केला आहे. शरजील इमामचा तपास क्राइम ब्राँचच्या पाच टीम करत होत्या. त्याच्याविरोधात सहा राज्यांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'कडाक्याच्या थंडीतही शाहीन बागमधील आंदोलनकर्त्यांपैकी एकाचाही मृत्यू का होत नाही?'
JNU Protest : देशद्रोही विधान करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक
VIDEO: परिसर मोकळा करा, अन्यथा माणसं मरतील; शाहीन बागेत बंदुकधारी घुसल्यानं खळबळ
जिथं सांगाल, तिथं येईन, मला गोळी मारा; औवेसीनं दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज
‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का?; शिवसेनेचा सवाल