पावसाचे दिवस आणि त्यात इथेनॉल मिश्रीत इंधन यामुळे अनेकांच्या गाड्यांच्या इंधनाच्या टाकीत पाणी तयार होत आहे. या पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी टाक्यांमध्ये या थेंबापासून इथेनॉलबरोबर प्रक्रिया होऊन ते पाणी तयार करत आहे. अशातच पेट्रोल पंपांच्या टाकीत देखील पाणी होत आहे आणि ते ग्राहकांच्या वाहनांत जाऊन वाहने बंद पडत आहेत. असाच प्रकार मध्यप्रदेशमध्ये घडला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ताफ्यासाठी इंदूरहून रतलामला १९ इनोव्हा कार मागविण्यात आल्या होत्या. शुक्रवारी रतलाममध्ये रीजनल कॉन्क्लेवचे आयोजन करण्यात आले आहे. याला यादव यायचे होते. म्हणून गुरुवारी रात्री या १९ इनोव्हा कार डिझेल भरण्यासाठी ढोसी गावाजवळच्या भारत पेट्रोलिअमच्या पेट्रोल पंपावर पाठविण्यात आल्या. डिझेल भरून या कार परत येत होत्या. इतक्यात एकेक करून कार बंद पडायला लागली. यामुळे धावपळ उडाली. चालकांच्या इंधनात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रशासनाला कळविल्यावर गोंधळ उडाला. या कार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असणार होत्या. पण त्या आदल्या रात्रीच सगळ्या बंद पडल्या.
यामुळे सरकारी अधिकारी, पोलीस या पेट्रोल पंपावर आले, काही ड्रायव्हर देखील या ठिकाणी आले. या काळात जे लोक या पंपावरून इंधून भरून गेले होते ते देखील तक्रार घेऊन यायला लागले. या लोकांच्या इंधन टाकीत पेट्रोल, डिझेल ऐवजी पाणी सापडले. अक्षरश: पेट्रोल पंपावरच गॅरेज सुरु झाले. मेकॅनिकला बोलविण्यात आले. दुचाकींच्या टाक्या खोलून त्यातील इंधन काढले गेले तर त्यात पाणी सापडले. अनेकांच्या बाबतीत हे झाल्याने प्रशासनाने अखेर तो पेट्रोल पंपच सील केला आहे.
आता या वाहन चालकांना त्यांचे इंजिन साफ करून घ्यावे लागणार आहे. याचा खर्च आता पेट्रोल पंपचालक देतो की वाहनचालकांनाच नाहक भुर्दंड पडतो, हे पहावे लागणार आहे. प्रशासनाने रातोरात पुन्हा इंदूरहून कार मागविल्या आहेत. या १९ इनोव्हा कारमध्ये प्रत्येकी 20 लीटर डिझेल भरण्यात आले होते. त्यात १० लीटर पाणीच सापडले आहे. एका ट्रक चालकानेही या पंपावर २०० लीटर डिझेल भरले होते, तो देखील काही अंतरावर जाऊन बंद पडला आहे.