पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना भारताच्या सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. तसेच या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानच्या हवाई तळांवर तुफानी हल्ला चढवत जबर नुकसान केले होते. त्यामुळे पाकिस्तानला युद्धविरामासाठी विनवणी करणे भाग पडले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकसित बनवण्यामध्ये कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २०१४ पूर्वी नेहमी दहशतवादी हल्ले व्हायचे. अनेक कटकारस्थाने व्हायची. मात्र त्याला काहीच उत्तर दिलं जात नव्हतं. मात्र आता असं होत नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, आमच्या सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिलं. सैन्यदलामुळे आमची मान अभिमानाने उंचावली. आम्ही आता अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, असेही अमित शाह म्हणाले.
एका कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, आम्ही पाकिस्तानमध्ये १०० किमीपर्यंत आत घुसून प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानचे हवाईतळ उद्ध्वस्त केले. आमची एअर डिफेन्स सिस्टिम खूप मजबूत आहे. आज पाकिस्तान भयभीत झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हापासून दहशतवाद्यांनी तीन मोठे हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. आज भारताने केलेल्या कारवाईकडे संपूर्ण जग आश्चर्यचकीत होऊन पाहत आहे. तर पाकिस्तान भयभीत झालेलं आहे.
अमित शाह पुढे म्हणाले की, जेव्हा उरी येथे हल्ला झाला तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करून प्रतीकात्मक उत्तर देण्यात आलं. पुलवामा येथे हल्ला झाला तेव्हा एअर स्ट्राईक करून उत्तर देण्यात आलं. मात्र पाकिस्तानमधील दहशतवादी सुधरले नाहीत आणि त्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. जगभरातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक जेव्हा ऑफरेशन सिंदूरचं विश्लेषण करतात. तेव्हा ते आश्चर्यचकीत होतात, असेही अमित शाह म्हणाले.